मुंबई : राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे राबविल्या जाणाऱ्या इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर होण्याआधीच अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. २५ मेपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरु होईल तर निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.
२५ मे पासून सकाळी ११ वाजल्यापासून ते दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत अकरावी प्रवेश अर्जाचा भाग एक ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. तर निकालानंतर अर्जाचा भाग दोन भरण्यास वेळ दिला जाणार आहे. यात विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजचे पसंती क्रमांक देऊन इतर माहिती भरावी लागणार आहे.
सीबीएसई बोर्डाचा निकाल १२ मे रोजी तर आयसीएसई बोर्डाचा निकाल १४ मे रोजी जाहीर झाला. एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल मात्र अजून प्रतिक्षेत आहे आणि त्याआधीच विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची तयारी करावी लागणार आहे. राज्याच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात पहिली प्रवेश फेरी पूर्ण करून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुसरी आणि तिसरी फेरी व त्यासोबतच विशेष फेरीचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात येईल.