कणकवली (प्रतिनिधी) : ‘ज्या व्यक्तीने कधी सरपंच पदाची साधी निवडणूक लढविलेली नाही, ते संजय राजाराम राऊत हे कर्नाटक निवडणूक निकालावर भाष्य करत आहेत. हा प्रकारच हास्यास्पद आहे’, अशी खोचक टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. कणकवली येथील प्रहार भवन येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, संजय राऊत यांच्या आरोपांना त्यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर देखील दिले. कर्नाटक निवडणुकीत महाराष्ट्र एकिकरण समितीला एकही जागा मिळालेली नाही. याबाबत संजय राऊत यांना त्यांनी टोला लगावला. ‘राहुल गांधींबरोबर तुमचे चांगले संबंध होते ना, मग त्यांना सांगायचे होते की महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार देऊ नका. खरं म्हणजे राहुल गांधी, सोनिया गांधी तुमची काय किंमत करतात ते एकदा नाना पटोलेंकडून ऐकून घ्या’, असे ते म्हणाले.
‘ज्यांना निवडणूक म्हणजे काय हे समजते, राजकारण म्हणजे काय हे समजते, ते लोक या संजय राऊत सारखे लगेच बोलणार नाहीत. लोकप्रभात असताना संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जेवढे काही घाणेरडे बोलायचे, तेच संजय राजाराम राऊत आता त्यांचा मालकाचे दुकान बंद करण्याच्या प्रयत्नात आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारासाठी संजय राऊत तिकडे गेले होते, तिथे काय झाले ? ते सांगा. काँग्रेसच्या उमेदवारांमुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार पराभूत झाल्याचे देखील आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
‘कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे की, अपात्रतेचा निर्णय अध्यक्ष घेणार. मग हेच महाशय त्यांच्यावरच टीका करतात. अध्यक्षांना चिडवायचे, जेणेकरून उद्धव ठाकरे यांना अजून कसा संपवू शकतो हे संजय राऊत पाहत आहेत. समीर वानखेडेंवर सीबीआयची धाड पडली त्यावर बोलताना आ. राणे म्हणाले की, असेच भ्रष्ट अधिकारी संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना लागतात. समीर वानखेडे यांनी चुकीचे काय केले असेल, तर कारवाई होणारच, असेही आमदार राणे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच संजय राऊत यांना, तुमचे मालक मुख्यमंत्री असताना सचिन वाझे याला परत सेवेत रुजू करून का घेतले होते? वाझेंना कितीच टार्गेट दिले होते? सचिन वाझे आठवड्यातून पाच दिवस वर्षा बंगल्यावर राहायचा. दिशा सालीयनच्या घरी जी मर्सिडीज पाठवली गेली ती सचिन वाझेंचीच होती. त्या रात्री आदित्य ठाकरेंचे सचिन वाझेला किती फोन गेले, याचे उत्तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी द्यावे, अशी मागणीही आ. नितेश राणे यांनी केली आहे.