Saturday, March 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाजस्थलांतरित पक्षी

स्थलांतरित पक्षी

  • विशेष: डॉ. श्वेता चिटणीस

जसे गड, किल्ले, गुंफा इत्यादी आपल्या देशाच्या ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या खुणा आहेत व या जपणे, त्यांचे रक्षण करणे, त्या नामशेष होण्यापासून वाचवणे हे आपले कर्तव्य आहे तसेच आपल्याला जन्मतःच नैसर्गिक वारसासुद्धा लाभलेला आहे. भारताचा नैसर्गिक वारसा म्हणजेच आपल्या परिसरातलं वातावरण. आपल्या परिसरातल्या पाणी, माती, वनस्पती, वृक्ष, कीटक, पशू आणि पक्षी हे घटक व यांना जपणे, त्यांचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येक देशाचे नागरिक त्यांचा नैसर्गिक वारसा जपताना दिसतात; परंतु स्थलांतरित पक्षी हे कोणत्याच एका देशात आजन्म राहत नाहीत. ते अनेक देशांतून स्थलांतर करतात. अर्थात ते दोन देशच नव्हे, तर दोन किंवा अधिक खंड एकमेकांशी जोडतात. त्यामुळे ते अनेक देशांचे पाहुणे असतात आणि माय देशांचे रहिवासी असतात. याचा अर्थ ते मूल्यवान आंतरराष्ट्रीय वारसा आहेत. त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे त्यांना अभय देणे हे त्यांच्या स्थलांतर करण्याच्या मार्गावर असणाऱ्या देशांचे कर्तव्य आहे.

१३ मे आणि १४ ऑक्टोबर हे वर्षातून दोन दिवस जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस म्हणून साजरे होतात. हे दोन दिवस युरोप, अमेरिका, आफ्रिका तसेच आशिया खंडात साजरे करण्यात येतात. बहुतेक विशेष महत्त्व असणारे दिवस वर्षातून एकदाच साजरे होतात; परंतु स्थलांतर करताना पक्षी एकदा उष्ण प्रदेशात स्थलांतर करतात आणि पुन्हा आपल्या मायदेशी थंड हवामानात परततात. हे दिवस वर्षातून दोनदा साजरे होतात, कारण स्थलांतर करणारे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी कित्येक किलोमीटरचे अंतर न थकता सतत उडून त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचतात. त्यानंतर ऋतू बदलला की, पुन्हा ज्या स्थळापासून निघाले तिथे परतण्याची तयारी करतात. मुंबईमध्ये हिवाळ्यात फ्लेमिंगो, सीगल, godwit, करकोचे व इतर पक्षी हजारोंच्या संख्येने येतात व हिवाळा संपताच ते जिथून आले त्या देशात परत जातात. हिवाळ्यात स्थलांतर करणारे पक्षी भारतात पार सायबेरिया, रशिया, अफगाणिस्तान, इराण आणि इतर देशांतून येतात आणि हिवाळा संपू लागताच, ते त्या देशात परत जातात. मायदेशी परतून त्या पक्ष्यांचा विणीचा हंगाम सुरू होतो आणि नवीन पिलांचा जन्म होतो. उदाहरणार्थ भारतात फ्लेमिंगो हे पक्षी कच्छच्या रणामधून हिवाळ्यात भारताच्या इतर भागात स्थलांतर करतात आणि पावसाळ्यात कच्छमध्ये परतून नवीन पिलांना जन्म देतात. फ्लेमिंगो किंवा रोहित या सुंदर पक्ष्यांच्या हजारोंच्या संख्येमुळे कच्छ या शहराला ‘फ्लेमिंगो सिटी’ असेही पक्षीप्रेमी म्हणतात.

अनेक वेळा असा प्रश्न पडतो की, हे पक्षी कसे बरे मार्गक्रमण करत असावेत? त्यांना कोण रस्ता दाखवतो? किती मैल उडायचं, कोणत्या दिशेने उडायचं, ते त्यांना कसं कळतं? दिवसा उडायचं की, रात्री हे ते कसे ठरवतात? काही पक्षी तर अगदी चिमणीएवढे लहान किंवा त्याहीपेक्षा लहान असतात, तर ते इवलेसे पक्षी इतके मैल उडू शकतात, यावर आपला विश्वासही बसत नाही! याचे उत्तर एकच आहे. ‘सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट’ हा सिद्धांत आपल्याला डार्विन नावाच्या थोर शास्त्रज्ञाने सांगितला आहे. इवलेसे पक्षी, जेव्हा पाहतात की, त्यांच्या आजूबाजूची जमीन आणि झाडं सगळंच बर्फाच्छादित होत आहे आणि आता फळं, फुलं, छोटे कीटक हे खाद्य मिळणं बंद होऊ शकतं, तेव्हा ते त्या भागातून स्थलांतर करून थोड्या उष्ण भागात येतात. जिकडे त्यांना मुबलक खाद्य मिळू शकतं. त्यानंतर ते हवेचे उष्ण आणि शीत ओळखून जिकडे त्यांना खाद्य मिळू शकेल, अशा उष्ण प्रदेशात मार्गक्रमण करतात. पक्षी सहसा एकटे-दुकटे स्थलांतर करत नाहीत, तर संपूर्ण हजारो पक्ष्यांचा थवाच्या थवाच एकत्र स्थलांतर करतो. एकत्र राहिल्यामुळे त्यांचा शत्रूपासून संरक्षण होतं आणि अनुभवी पक्षी इतर पक्ष्यांना मार्गदर्शन करतात. पक्ष्यांवर अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांनी पक्ष्यांचा अभ्यास करायला तारांगण उभारलं आणि पक्ष्यांना आभासी आकाश तारे, हवेचे कमी अधिक दाबाचे पट्टे इत्यादी निर्माण केले आणि त्यातून पक्षी आपली वाट कशी निवडतात, याचा अभ्यास त्यांनी केला. तेव्हा त्यांना पक्ष्यांच्या स्थलांतराबाबत वर सांगितलेले निष्कर्ष काढता आले. बहुतेक पक्ष्यांच्या मेंदूमध्ये पृथ्वीच्या magnetic field किंवा चुंबकीय क्षेत्राचे ज्ञान असते. एकदा एका मार्गावरून गेल्यावर ते पुन्हा दुसऱ्या वर्षी त्यास मार्गाने प्रवास करतात. हेही त्यांच्या मेंदूमध्ये नोंदलेले असते. अनेक देशात स्थलांतरित पक्ष्यांच्या अभ्यासासाठी वैज्ञानिक ‘टॅगिंग’ ही प्रक्रिया वापरतात. या प्रक्रियेत पक्ष्यांच्या पायात एखादी बारीकशी तार बसवणे व त्यावर त्या भौगोलिक भागाचा कोड लिहिणे इत्यादी माहिती या टॅगवरून तो पक्षी इतर देशात जातो, तिथल्या वैज्ञानिकांना मिळू शकते. त्यामुळे तो पक्षी कोणत्या देशातून आला आणि कुठे जाणार आहे किंवा इतर कोणत्या देशात तो पक्षी आढळला याचा अभ्यास वैज्ञानिक सतत करत असतात. उदाहरणार्थ या वर्षी एका पाणथळ जागी दिसलेले पक्षी पुढच्या वर्षी पुन्हा त्याच पाणथळ जागी दिसण्याची हमी हा अभ्यास देऊ शकतो. (क्रमश:)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -