केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूने दिल्यानंतर केंद्रीय सुक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. निकाल अपेक्षेप्रमाणे लागल्याने मुख्यमंत्री खुश व समाधानी आहेत, असं नारायण राणे म्हणाले.
माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचं मी अभिनंदन करतो. मी सकाळी ट्विट केल्याप्रमाणे निकाल शिंदे- फडणवीस सरकारच्या बाजुने लागलेला आहे, त्यामुळे त्यांचं अभिनंदन”.
पुढे ते म्हणाले की, “जर ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर..’ अशा जर आणि तरला मी उत्तर देत नाही. उद्धव ठाकरेंच्या स्वतःच्या चुकीमुळे शिवसेना संपली, नियमांचं अज्ञान असल्यामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं, त्यामुळे उद्धव ठाकरे हा प्रश्नच आता उरत नाही. माननीय शरद पवार यांनीदेखील आपल्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरे यांची पात्रता, गुणवत्ता काढलेली आहे”.
शिंदे – फडणवीस सरकार जोमाने काम करतंय ते काही लोकांना पचत नाही आहे, त्यामुळे हे सरकार कशा रितीने विकास करु शकतं, लोकहित जपू शकतं याचा प्रत्यय दाखवण्याची ही संधी मिळाली आहे, असं म्हणत नारायण राणेंनी शिंदे – फडणवीस सरकारला शुभेच्छा दिल्या.