Thursday, April 24, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखबेपत्ता मुलींची वाढती संख्या चिंताजनक

बेपत्ता मुलींची वाढती संख्या चिंताजनक

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून सध्या देशात वाद सुरू आहेत. मुस्लीम युवकांकडून हिंदू मुलींना फसवून सीरिया, अफगाणिस्तान अशा देशांमध्ये नेल्याचे सांगण्यात येत आहे. देशातील गुजराथ, राजस्थान, केरळ, मध्य प्रदेश आदी राज्यांतून ५० हजारांहून अधिक मुली बेपत्ता झाल्याच्या दावा केला जात आहे. हा आकडा जसा चक्रावून टाकणारा आहे तसा तो चिंतेत भर टाकणारा आहे; परंतु महाराष्ट्रातूनही मुली बेपत्ता होण्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली. फक्त मार्च महिन्यात राज्यातून २ हजार दोनशे महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत, तर आकडेवारीनुसार दररोज राज्यातून ७ मुली बेपत्ता होत असल्याची माहिती आहे. बेपत्ता होणाऱ्या मुली या १८ ते २० वयोगटातील असल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान, जानेवारीमध्ये राज्यातून १ हजार ६०० मुली बेपत्ता झाल्या होत्या. फेब्रुवारीमध्ये १ हजार आठशे दहा, तर मार्च महिन्यात बेपत्ता झालेल्या मुलींची संख्या ही २ हजार २०० वर पोहोचली आहे. ही बाब खूप धक्कादायक असून यावर तत्काळ तपास सुरू होण्याची गरज असल्याचे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले असले तरी तपास यंत्रणा या प्रश्नी किती गांभीर्याने पाहत आहेत, ही बाब महत्त्वाची आहे.
महाराष्ट्रासह देशात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत आहे. मुलींची दिशाभूल करून त्यांचे अपहरण करण्याचे प्रकारही वाढले आहेत. या बेपत्ता मुलींचे पुढे काय होते हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. गरज पडत असेल तर त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासकीय स्तरावर काही होत आहे का? याबाबत महिलांच्या संबंधाने काम करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ यांची मते जाणून घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. हा विषय अतिशय गंभीर असून गृह तसेच महिला व कुटुंब कल्याण विभागाने एकत्र येऊन याबाबत तातडीने काम करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा विचार करता पुणे-२२८, नाशिक-१६१, कोल्हापूर-११४, ठाणे-१३३, अहमदनगर-१०१ या भागातून मुली बेपत्ता झाल्याची उदाहरणे आहेत. दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुलींची संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. २०२० पासून देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे हरवलेल्या व्यक्तींमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. यासाठी सगळी यंत्रणा कार्यरत असणे आणि त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

खरंतर ज्या शहरांमध्ये किंवा प्रदेशांमध्ये महिला रात्री-अपरात्री सुरक्षितपणे घरी येऊ शकतात. तो प्रदेश हा सुरक्षेच्या दृष्टीने चांगला असा मानला जातो; परंतु आपल्या देशातील काही प्रदेशातून मुली गायब होत असल्याचा धक्कादायक आकडा समोर येत आहे. आपल्या घरातील एखादी व्यक्ती रात्री उशिरा आली तरी आपल्याला किती चिंता वाटते; परंतु काही गायब केसेसमध्ये दोन ते तीन वर्षे मुली या कुटुंबापासून लांब असतात. त्यामुळे आई-वडिलांना जेवणाचा घास कसा घशाखाली जाईल. कुटुंब हे तणावाखाली असते. त्यामुळे आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती बेपत्ता झाली, तर काय अवस्था होईल याचा विचार पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी करायला हवा. राजकीय पक्षांकडून बेपत्ता मुलींच्या वाढत्या संख्येवरून केंद्र सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत; परंतु त्यात काही तथ्य नाही. त्याचे कारण प्रत्येक पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार होते. त्याचा तपास स्थानिक पोलीस करत असतात. या मिसिंग तक्रारीसाठी प्रत्येक पोलीस आयुक्तालयात विशेष कक्ष नेमलेला असतो. या कक्षामार्फत स्थानिक पोलिसांसोबत समांतर तपास केला जात असतो. त्यामुळे या तपास कामात केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचा थेट हस्तक्षेप नसतो. मात्र, लव्ह जिहादसारख्या अनेक घटना आपल्या डोळ्यांसमोर घडत आहेत. धर्माच्या नावाखाली हिंदू महिला किंवा मुलींना जाळ्यात फसवून त्यांचे धर्मांतर केले जाते. अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे केरळा स्टोरी या चित्रपटातील कथानकाकडे लक्ष वेधले गेले आहे.

या मुली बेपत्ता का झाल्या, त्यामागची कारणे शोधली पाहिजेत. गेले अनेक वर्षे आपण मुले पळविणारी टोळी ऐकत असतो. चॉकलेट किंवा खाऊचे आमिष दाखवून मुलांना पळविले जाते. त्या मुलांना त्याचे हात-पाय तोडून भिकेला लावले जाते, असेही बोलले जाते; परंतु मुलींना कोण पळवून घेऊन जातो की त्यांना प्रलोभने दाखवून, फूस लावून नेण्यात येते, अशी काही उदाहरणे समोर आली आहेत. अनेकदा १८ वर्षे पूर्ण न झालेल्या; परंतु १५ वर्षांच्यावर असलेल्या मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पळविले जाते; परंतु अल्पवयीन मुली असल्याने आपण लग्न केले आहे हे सांगण्यासाठी त्याचे कुटुंबीय किंवा बेपत्ता असलेली मुलगी पोलिसांना तक्रार मागे घ्यावी असे सांगण्यास येत नाही. त्यामुळे राज्यातील काही केसेस अशा रितीने रेकॉर्डवर राहिलेल्या असतात, अशी माहितीही पुढे येत आहे; परंतु सज्ञान असलेल्या मुलींनी आणि तरुणींना प्रलोभनापोटी कोणाच्या मोहजाळात फसता कामा नये, असा सल्ला द्यावासा वाटतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -