अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष
पॅकींगवर बेस्ट बिफोर एक्सपायरी डेटच नाही
गुजरातमधून येतो माल
सप्तशृंगगड (प्रतिनिधी): लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर वर्षातून दोन यात्रा भरते. एक चैत्रोत्सव व दुसरा नवरात्र उत्सव.यावेळी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात रविवारची सुट्टी , मंगळवार, शुक्रवार हे देवीचे वार तसेच मे महिना सुट्टीचा कालावधी आणि दिवाळी या काळात दर्शनार्थी भाविकांची प्रचंड गर्दी असते. एरव्ही हजारो भाविक दर्शनासाठी व पर्यटनासाठी गर्दी करताना दिसतात. या गर्दीची श्रद्धा म्हणून लाखोंचा पेढा प्रसाद म्हणून विक्री होतो. सप्तशुंगी गडावर पेढे विक्री करणारे फनिक्यूलर रोपवे, पहिली पायरी ते उतरती पायरी व अंतर्गत गावात तीनशे ते चारशे स्टॉलधारक असून खुली मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांच्या ट्रेवर बेस्ट बिफोर एक्सपायरी डेट टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरीही या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. विशेषतः गुजरात राज्यातून लाखो रूपयांचा मलई,मावा पेढा,कलाकंद विक्रीसाठी गडावर आणला जात आहे. दहा किलो मालाची पॅकिंग असून बेस्ट बिफोर व एक्सपायरी दिनांक नसल्याने त्याच्या गुणवत्तेविषयी संशय निर्माण झाला आहे. भाविकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सप्तशृंगी गडावर सुरू असून अन्न प्रशासन सुस्त व पेढेवाले मस्त, ” अशी अवस्था पाहायला मिळत आहे.
उघड्यावर ठेवलेली मिठाई, शिळे अन्नपदार्थ खाल्ल्याने विषबाधा होण्याचे प्रकार घडतात. मुदत संपत असल्याची तारीख लिहिल्यास खराब मिठाईची विक्री होणार नाही. ग्राहकांनी देखील लक्ष दिले पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही. चेत्रोत्सव यात्रेदरम्यान अन्न व औषध प्रशासनाकडून धडक मोहीम राबवून अन्न पदार्थाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. परंतु थातुरमातुर कारवाई करून फक्त कागदावरच कारवाई असल्याचा आरोप भाविकांनी केला आहे.
फक्त यात्रा कालावधी आला की अन्न व औषध प्रशासन जागे होते. इतर दिवशी ढुकूंनही बघत नाही. फक्त बघ्याचीच भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गुजरात राज्यातून येणाऱ्या मावा मलाई व कलाकंद गडावरील होलसेल विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन विभाग त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करेल का अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे.
याबाबत दिंडोरी येथील भाविक बापू चव्हाण यांनी, सप्तशृंगी गडावर भाविक भक्त प्रसाद म्हणून कलाकंद (पेढे) घरी घेऊन जातात. मात्र या कलाकंद पेढ्याच्या पदार्थाने घश्याला खवखव, खाज सुटते. भाविकांचे आरोग्य लक्षात घेऊन अन्न औषध विभागाने याकडे लक्ष देऊन कडक कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच होलसेल विक्री करणाऱ्यावर कारवाई केली तर होणारा त्रास टळेल, असे म्हटले आहे.