महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांची माहिती
मुंबई ( प्रतिनिधी) : महाराष्ट्रात रोज सरासरी ७० मुली गायब होत आहेत. जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत महाराष्ट्रातून ५ हजार ५१० मुली बेपत्ता झाल्या असल्याची धक्कादायक माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रूपाली चाकणकर म्हणाल्या की, जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात १६०० मुली बेपत्ता झाल्या, फेब्रुवारी महिन्यात १८१० तर एप्रिल महिन्यात २२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांची संख्या वाढते आहे हे आपल्यासाठी चिंताजनक आहे. यामध्ये २०२० पासून हरवलेल्या व्यक्तींबाबत दुर्दैवाने पहिल्या क्रमांकावर आहे. यासाठी खरंतर फार मोठी यंत्रणा कार्यरत असणे आणि त्या यंत्रणेचा वापर केला जाणे आवश्यक आहे. पण तसे होताना दिसत नाही. राज्य महिला आयोगाच्या वतीने गेल्या १६ महिन्यांपासून आम्ही सातत्याने पाठपुरवठा करतो आहे.