पालिका करणार २ कोटी ६९ लाख रुपये खर्च
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील गोराई जेट्टीला आता सुशोभीकरणाचा स्पर्श होणार आहे. मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत गोराई जेट्टी आणि समुद्र किनारा यांचेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी २ कोटी ६९ लाख रुपये खर्च होणार आहे.
मुंबईत सध्या सुशोभिकरणाची कामे सुरू आहेत. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाची घोषणा केली होती. या प्रकल्पांतर्गत रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, सुशोभित हरितीकरण, आकर्षक प्रकाशयोजना अशी कामे केली जाणार आहेत. यामध्ये बोरिवलीला लागून असलेल्या गोराई परिसराला देखील सुशोभीकरणाचा स्पर्श होणार आहे. मुंबईपासून जवळ असलेला हा परिसर काहीसा अविकसित आहे. मूलभूत सोयीसुविधादेखील या परिसरात नाहीत. मात्र सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत या परिसराचेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
प्रकल्पांतर्गत १६ विविध प्रकारची कामे केली जाणार आहेत. या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात ५०० तर दुसऱ्या टप्प्यात ३२० व इतरही अतिरिक्त अशी एकूण १ हजार ०७७ कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी ६१३ कामे पूर्ण झाली आहेत म्हणजे ५० टक्के कामे पूर्ण झाली आहेत.