Monday, March 24, 2025
Homeकोकणरायगडई-रिक्षामुळेच माथेरानची वाहतूक समस्या सुटणार

ई-रिक्षामुळेच माथेरानची वाहतूक समस्या सुटणार

पर्यावरणाचा ऱ्हास थांबू शकतो, असा टीसचा निष्कर्ष अहवाल

माथेरान (प्रतिनिधी) : ई-रिक्षामुळेच माथेरानची वाहतूक समस्या सुटणार असून पर्यावरणाचा ऱ्हास थांबू शकतो, असा निष्कर्ष अहवाल टीसने दिला आहे.

श्रमिक रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांनी हात रिक्षाचालकांची अमानवीय प्रथेतून मुक्तता व्हावी, यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने १२ मे रोजी निकाल दिला व पर्यावरण पूरक ई-रिक्षाची मागणी मान्य केली. त्यासोबत राज्य सरकारच्या मागणीनुसार तीन महिन्यांच्या पायलट प्रोजेक्टला मान्यता दिली होती. ई-रिक्षाचा येथील जनतेवर कशा प्रकारचे आर्थिक व सामाजिक परिणाम होऊ शकतात याचा शास्त्रोक्तपणे अभ्यास करण्यासाठी सनियंत्रण समितीने टाटा सामाजिक संस्थेला (टीस) जबाबदारी दिली होती. प्राध्यापक सुहास भस्मे व प्रा. चैतन्य तलरेजा यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या इतर सदस्यानी २५ जानेवारी २०२३ ते २८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान खालील व्यक्ती व संघटनांसोबत चर्चा केली होती.

अश्वपालक ७६, हात रिक्षाचालक ३६, हमाल ७४, गृहिणी १०१, प्रवासी ७९ अशा प्रकारे ३६६ लोकांसोबत चर्चा केली. माथेरान नगरपालिका सभागृहात विविध संघटनांच्या पदाधिकारी यांच्या सोबत संवाद साधला, तर अश्वपाल संघटना, हमाल संघटना, ३० जानेवारी, महिला बचत गट १ फेब्रुवारी, हातरिक्षाचालक ६ फेब्रुवारी, व्यापारी संघटना २७ फेब्रुवारी व हॉटेल संघटना १ मार्च रोजी चर्चा केली. टीसने ई-रिक्षा सुरू होण्यापूर्वी एकूण १५ विविध घटकांवर होणारे परिणाम व ई-रिक्षा सुरू झाल्यानंतर झालेला बदल याची प्रकरण क्र ६.१ मध्ये माहिती दिली आहे. विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला, रुग्ण, पर्यटक, अश्वपालक, हात रिक्षा चालक, परगावातून आलेले रिक्षा चालक, वाहतूक, घोडे ई-रिक्षा नसताना वन ट्री हिल परिसरातील नागरिकांना टॅक्सी स्टँडपासून सहा ते सात किलोमीटर पायपीट करावी लागते. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल होणे त्रासदायक ठरते. तीन महिन्यांच्या ई-रिक्षाच्या पायलट प्रोजेक्टदरम्यान या घटकांना मोठा दिलासा मिळाला. त्यांची दमछाक थांबली. रु. ३५ दर आकारला जात असल्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तींनादेखील ई-रिक्षा फायदेशीर ठरल्या आहेत.

अश्वपालकांनी ई-रिक्षा सुरू झाल्यास व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली, तर काही घोडेवाल्यानी ई-रिक्षा ज्येष्ठ नागरिक व महिलांना फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढू शकते. याचा फायदा घोडेवाल्यांनादेखील होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला. टीस या संस्थेने करंदीकर यांचा २०१० च्या पर्यावरण व्यवस्थापन आराखडा याच्या मदतीने घोड्यामुळे दस्तुरी नाका येथील पर्यावरण व सिम्पसन टँक या तलावाचा होणारा ऱ्हास यावर देखील अभ्यासपूर्व मत व्यक्त केले आहे ई-रिक्षा या माथेरानचे पर्यावरण वाचविण्यास मदत करू शकतात. त्यामुळे घोड्याच्या वाढणाऱ्या संख्येवर अंकुश घालू शकतात.

ई-रिक्षाची ऊर्जा खर्च करण्याची क्षमता ही ५३.७६ केजे इतकी आहे. ही इतर वाहनांपेक्षा सर्वात कमी आहे. ई-रिक्षा कायमस्वरूपी सुरू करण्यापूर्वी टप्प्याटप्प्याने गरजेनुसार संख्या वाढवावी. ई-रिक्षा सुरू झाल्यानंतर ज्या घटकांवर आर्थिक परिणाम होऊ शकतात. अशा व्यक्तींसोबत सरकारने संवाद साधून त्यांना आर्थिक पॅकेज द्यावे, अशी महत्त्वपूर्ण सूचना टीसने केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -