भाजप नेते आमदार नितेश राणे यांची घणाघाती टीका
मुंबई : संजय राऊत हे चायनीज मॉडेल आहे. राजकारणासाठी त्यांच्यासारखी माणसं चोरबाजारात स्वस्तात मिळतात. संजय राऊतांनी उठसूठ भाजप नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करू नयेत. राऊतांना ही नम्र विनंती आहे. राऊतांनी भाजप नेत्यांवर असेच बिनबुडाचे आरोप सुरू ठेवले तर मी देखील उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे कपडे काढायला कमी करणार नाही, असा इशारा भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
कोकणातील भाजप नेत्याच्या १०० सेल कंपन्या आहेत. त्यात काही हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप नारायण राणे यांचे नाव न घेता आज ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर लगेच भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर हल्लाबोल केला.
…तर मी ठाकरेंचे कपडे टराटरा फाडेन
आज सकाळीच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.
आम्ही ओरिजिनल शिवसैनिक म्हणून मोठे झाले आहोत. आम्ही राऊतांसारखे चायनीज मॉडेल नाही. त्यामुळे राऊतांनी इथून पुढे विचार करुन आमच्या नेत्यांवर बोलावे. त्यांनी आमच्या नेत्यांवर काही बोलल्यास मी अर्ध्या तासात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे कपडे टराटरा फाडीन, असे म्हणत नितेश राणे यांनी राऊतांना सडेतोड उत्तर दिले आहे.
शिंदे व फडणवीस यांच्यावर बोलण्याची राऊतांची लायकी नाही. राऊत तुम्ही अजून राणेंना ओळखलेले नाही. त्यामुळे यापुढे विचार करुन बोलायचे. जर फडणवीसांबद्दल काही बोललास तर मी ठाकरेंचे कपडे फाडीन, असा धमकी वजा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
राऊतांवर देशद्रोहाचा खटला दाखल करा
राऊत हे सत्यपाल मलिक यांना भेटणार आहेत. मलिकांविषयी पाकिस्तान गोडवे गात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी करण्याचे काम मलिक करत आहे आणि अशा व्यक्तीला राऊत भेटणार आहेत. त्यामुळे माझी अशी मागणी आहे की राऊत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणी मी करत आहे, असे राणे म्हणाले आहेत.
पत्राचाळीतल्या माणसांना यांनी बेघर केले
तसेच पत्राचाळीतील माणसे ही काय पाकिस्तानी होती का, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. पत्राचाळीतल्या माणसांना यांनी बेघर केले. त्यांन रस्त्यावर आणले आणि आता बेळगावला चालला आहे, अशा शब्दात राणेंनी राऊतांना सुनावले आहे. हा स्वत: जामीनावर बाहेर आहे. तुला कधीही आतमध्ये टाकतील. त्यामुळे आजपासून चौकटीत रहायचे, अशी ताकीद राणेंनी राऊतांना दिली आहे.
तोंड उघडायला लावू नका
नितेश राणे म्हणाले, संजय राऊत यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी पोलीस किंवा हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात जावे. भाजप नेत्यांवर टीका करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या फोटोकडे पहावे. कारण आता त्यांनी असे आरोप केले की मी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर तशाच शब्दांत टीका करणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची अब्रू जावू नये, असे वाटत असेल तर संजय राऊतांनी सांभाळून बोलावे. कारण दिशा सालियन प्रकरणात तर आदित्य ठाकरे यांच्यावर खुनाचा आरोप आहे. उद्धव ठाकरे व त्यांच्या स्वकियावरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे आम्हाला तोंड उघडायला लावू नका, अशी सणसणीत चपराक नितेश राणे यांनी राऊतांना लगावली आहे.