- नंदकुमार पाटील: कर्टन प्लीज
काही दशकांपूर्वी कवितेचा कार्यक्रम म्हटला की, आयोजकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसायची. पण आता होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये कवी कोण हे जरी जाहीर झाले तरीही रसिकांची संख्या ही हेवा वाटणारी समोर असते. हा प्रेक्षकवर्ग निर्माण करण्यासाठी आता लौकिक प्राप्त असलेल्या कलाकारांचे जेवढे योगदान आहे. त्याहीपेक्षा पूर्वीच्या प्रतिभावंत, प्रज्ञावंत कवींनी जे योगदान दिलेले आहे ते महत्त्वाचे वाटते. जिथे कवितेचा प्रेक्षक वर्ग तिथे या प्रतिभावंत कवींनी जाऊन कवितेचे कार्यक्रम केलेले आहेत. कुठल्या नाट्यगृहात कवितेचा कार्यक्रम करायचा म्हणजे ‘प्रेक्षक तेवढे येतील का?’ या एका प्रश्नातून चर्चेला सुरुवात होत होती. आता रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो म्हणताना एखाद्या नाटकाचे किंवा वाद्यवृंदाचे प्रयोग व्हावेत तसे कवितेचे कार्यक्रम नाट्यगृहात होताना पाहायला मिळतात. थोडक्यात काय तर आयोजकांचा उत्साह आणि रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन खुर्च्या, टेबल मांडायचे की भारतीय बैठक ठेवायची हे पूर्वी ठरत होते.
आता त्याचे स्वरूप पूर्णपणे बदललेले आहे. वाद्य, संगीत, प्रकाशयोजना, नेपथ्य या साऱ्या गोष्टींनी कवितेचे कार्यक्रम पुढे सरकायला लागलेले आहेत. आता सादर होणाऱ्या कवितेचे कार्यक्रम लक्षात घेता काव्य भव्य दिव्य होतेय असे वाटायला लागते. ‘चौरस’ या कार्यक्रमात किशोर कदम अर्थात सौमित्र, स्पृहा जोशी, संदीप खरे, वैभव जोशी हे काव्यपट मांडण्यासाठी पुढे आलेले आहेत. मुक्ता बर्वे या अभिनेत्री ‘चारचौघी’ नाटकाचे प्रयोग करताना ‘प्रिय भाई, एक कविता हवी आहे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून काव्यवाचन सादर करणे सुरू केलेले आहे. यानिमित्ताने इतरही कवी मनाचे कलाकार त्यांच्यासोबत वावरताना दिसतात. संघर्षण कऱ्हाडे आणि स्पृहा जोशी हे कलाकार म्हणून आपल्याला परिचयाचे आहेत. पण आता या दोघांनी स्वतंत्रपणे कार्यक्रम सादर करणे सुरू केलेले आहे. त्यांच्या कवितेसोबत ते प्रज्ञावंतांच्या कविताही सादर करतात. गप्पा, किस्से असे त्याचे स्वरूप आहे. त्यांच्याही सोबत काही कलाकार दिसतात. या साऱ्या गोष्टी पाहिल्यानंतर प्रेक्षकांची अभिरुची बदलते आहे, हे लक्षात येते.