लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाठीच्या दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतलेला भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरवर लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र असे असले तरी तो डब्ल्यूटीसीची फायनल खेळणार नसल्याचे समजते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेतील अहमदाबाद कसोटीत जवळपास पूर्ण दोन दिवस मैदानावर घालवल्यानंतर अय्यरने पाठीच्या खालच्या भागात सूज आल्याची तक्रार केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत तो फलंदाजीसाठी येऊ शकला नाही. पाठीच्या दुखापतीचा त्रास होत असल्याने श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये खेळू शकला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरवर मंगळवारी लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली. तो जवळपास तीन महिने क्रिकेटपासून दूर असेल. त्यामुळे आता अय्यरला जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतून बाहेर राहावे लागणार आहे.