Monday, May 5, 2025

महामुंबईराजकीयमहत्वाची बातमी

राजकीय उलथापालथ होणार?

राजकीय उलथापालथ होणार?

मुंबई : जपान दौरा अर्ध्यावर सोडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज मुंबईत येणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याच्या राजकीय घडामोडीत नार्वेकर मुंबईत येणार म्हणजे राज्यात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ जपान दौऱ्यावर गेले आहेत.

दरम्यान अजित पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा सुरू असताना स्वत: अजित पवार यांनी यावर आपण अखेरच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीतच रहाणार असल्याचा स्पष्ट खुलासा केला आहे. असे असले तरी राहुल नार्वेकर यांना तातडीने का बोलवण्यात आले, असा सवाल अनेकांना पडला आहे.

राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरवल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता पाहता पडद्यामागे मोठे राजकारण सुरू असल्याचे सध्याचे चित्र आहे.

दरम्यान, १६ मार्च रोजी सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रजूड यांच्या घटनापीठाने आपला निकाल राखून ठेवला आहे. या निकालाकडे आता सर्वांच्या नजरा वळल्या आहेत. येत्या आठवडाभरात हा निकाल लागेल, अशी शक्यता आज शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.

तर, ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनीही पत्रकार परिषदेत आता लवकरच हा निकाल येईल. यात शिंदे गटाचे १६ आमदार नक्की अपात्र होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर येत्या दोन दिवसांत दोन मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, त्यातली एक दिल्लीत होईल आणि दुसरी महाराष्ट्रात होईल, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

यामुळे निकाल काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून भाजपची यापुढची रणनिती काय असेल याबाबत राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आले आहे.

Comments
Add Comment