नवीन शैक्षणिक वर्षात नवनवीन उपक्रम
शाळा वाचविण्यासाठी घोषणांचा पाऊस
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील अनुदानित शाळांना २ मे २०२३ पासून १४ जून पर्यंत उन्हाळी सुट्टी लागणार असून १५ जून २०२३ पासून शाळा पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
राज्यातील शाळा आधी १२ जूनपासून सुरू होणार होते. मात्र, शिक्षण विभागाने बदल करत आता राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहे. मुलांना त्यांची उन्हाळ्याची सुट्टी चांगल्या पद्धतीने नियोजन करता यावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
येत्या शैक्षणिक वर्षात नवनवीन उपक्रम
राज्यातील विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे आणि मुलांना शिक्षणासोबत इतर विविध ज्ञान मिळावे यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार केंद्राचा नवभारत साक्षरता कार्यक्रम घेतला जाणार आहे. यापुढे शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवी मुलांचे शाळेचे कपडे, वह्या, शूज आणि सॉक्स हे शासनातर्फे मोफत दिले जाणार आहेत. तसेच प्रत्येक धड्यानंतर आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे.
शाळा वाचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील
शाळांमध्ये इंटरॅक्टीव्ह टीव्ही लावले जाणार आहेत. कमी पटसंख्येंच्या शाळा बंद कराव्या लागू नयेत यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. पायाभूत सुविधा वाढवल्या जाणार आहेत. मराठीकडे आकर्षित करण्यासाठी उच्च शिक्षणही मराठीमध्ये करणार आहोत. मुलाच्या शाळेतील पहिल्या पावलाचे स्वागत केले जाणार आहे.