मुंबई : आजपर्यंत कुठलाही अधिकृत प्रस्ताव आमच्यासमोर आला नाही. त्यामुळे जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा निर्णय घेऊ. आज पक्षासमोर अजित पवारांचा काही विषयच नाही, असं म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सर्व चर्चांना पुर्णविराम दिला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजपाकडे विषय नाही, अजित पवारांकडे विषय नाही, पण माध्यमांमध्ये चर्चा आहे. त्यावेळी जे काही घडले त्यात देवेंद्र फडणवीसांची चूक नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही इच्छा जनतेने मतदानातून बहुमत देत व्यक्त केली. त्यामुळे सरकार बसवण्यासाठी प्रयत्न करणारच ना..त्यामुळे पहाटेचा शपथविधी हा त्या काळातील अपरिहार्य निर्णय होता असेही बावनकूळे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, तसेच जे झाले ते झाले, त्याचा आधार घेऊन अजित पवारांना वारंवार पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही. त्या काळात जे झाले ते झाले त्यावर देवेंद्र फडणवीसांनीही खुलासा केला आहे. अजित पवारांना टार्गेट करून त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करणे योग्य नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट पाहायला हवी. निकाला आधीच जर-तरच्या चर्चा करण्याचे कारण नाही असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
दरम्यान, नरेंद्र मोदी हेच भारताला पुढे घेऊन जातील असा विश्वास जनतेला आहे. शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील जनतेसाठी विकास करतेय. विकासाच्या जोरावर आम्ही लोकांसमोर जाणार आहे. २०२४ मध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त लोकसभा जागा जिंकल्या पाहिजेत हे आमचे मिशन आहे, असेही बावनकूळे यांनी सांगितले.