नागोठणे : ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी श्री सदस्यांचा उष्माघाताने झालेल्या मृत्यू बद्दल शोक व्यक्त केला आहे. श्री सदस्यांचा झालेला हा मृत्यू क्लेषदायक आहे. या घटनेवर कोणीही राजकारण करू नये असे आवाहनही आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले आहे.
श्री सदस्यांच्या मृत्यूनंतर आप्पासाहेबांनी एक जाहीर निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र शासानाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेले सारे श्री सदस्य हे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. माझ्या कुटूंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे.
आपल्याच कुटूंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित झालो आहे. माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटूंबियांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे. त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो, तसेच त्यांच्या कुटूंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी म्हटले आहे. झालेला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा असल्याचेही त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.