Friday, January 17, 2025
Homeताज्या घडामोडीम्हाडाच्या मालकीच्या जमिनीवरील बांधकांमासाठी परवानगी आवश्यक

म्हाडाच्या मालकीच्या जमिनीवरील बांधकांमासाठी परवानगी आवश्यक

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मालकीच्या कोणत्याही जमिनीवर एखाद्या व्यक्तीस नवीन/वाढीव पक्के बांधकाम करण्यासाठी म्हाडाच्या वांद्रे पूर्व मुख्यालयातील तळ मजल्यावर असणाऱ्या बांधकाम परवानगी कक्षात विहीत कागदपत्र दाखल करून बांधकामाची परवानगी घेणे अनिवार्य आहे. म्हाडाची परवानगी न घेता म्हाडा मालकीच्या जमिनीवरील बेकायदेशीर बांधकाम महाराष्ट्र नगररचना अधिनियम (MRTP Act) १९६६ मधील तरतुदीनुसार क्षेत्रीय पदनिर्देशित अधिकाऱ्यांमार्फत पाडून टाकण्यात येईल. म्हाडा मालकीच्या जमिनीवर बेकायदेशीर बांधकामास जबाबदार असणारे मालक, भोगवटादार, त्यांचा कॉन्ट्रॅक्टर तसेच अशा बांधकामास सहकार्य करणारे / संरक्षण देणाऱ्या संबंधित व्यक्तिविरुध्द फौजदारी गुन्हा स्थानिक पोलिस स्टेशनला दाखल केला जाणार असून, असे बेकायदेशीर बांधकाम पाडून टाकण्यास म्हाडाला आलेला खर्च संबंधित व्यक्तिकडून वसूल केला जाईल, याची नोंद घेण्याचे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे.

२३ मे २०१८ नुसार म्हाडाला आता विशेष नियोजन प्राधिकरणाचे म्हणजेच बांधकाम नकाशे मंजूर करण्याचे अधिकार शासनाने प्रदान केले असून मुंबई महानगरपालिकेचे म्हाडा अभिन्यास संबंधित अधिकार संपुष्टात आले आहेत. त्यानुसार म्हाडाच्या जमीनीवरील अतिक्रमण निर्मूलन कामी म्हाडा कार्यालयात स्वतंत्र अतिक्रमण निर्मूलन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या दि. ०५/०१/२०२२ च्या आदेशानुसार तात्पुरत्या स्वरूपाच्या बांधकामासाठी परवानगीचे अधिकार संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना प्रदान आहेत. निवासी वापराच्या गाळ्याचा अनिवासी कारणासाठी वापर करावयाचा असल्यास विभागाचे मिळकत व्यवस्थापक / मुंबई मंडळ यांच्या कार्यालयास अर्ज सादर करून प्रथम अधिकृत मान्यता प्राप्त करून घ्यावी, तसे न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

म्हाडा मुंबई मंडळातर्फे9 विशेष भरारी पथक

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे अतिक्रमण निष्कासन मोहिमेला वेग आला असून एमआरटीपी अॅक्ट १९७६ नुसार अतिक्रमण निष्कासन कामावर अधिक सतर्कतेने नियंत्रण राखणे व नियमानुसार कामकाज होत असल्याबाबत खात्रीसाठी विशेष भरारी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.
मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या निर्देशानुसार गठित या भरारी पथकाचे प्रमुख मंडळाचे उपजिल्हाधिकारी तथा अतिक्रमण निष्कासन विभागाचे प्रमुख नितिन कळंबे आहेत. मंडळाचे उपमुख्य अधिकारी पूर्व व उपमुख्य अधिकारी पश्चिम हे पथक उपप्रमुख आहेत. पथकात मंडळाच्या वांद्रे, बोरीवली, गोरेगाव, कुर्ला, शहर या विभागांनिहाय प्रत्येकी एक कनिष्ठ अभियंता व सहाय्यक/ वरिष्ठ लिपिक यांची नियुक्ती केली आहे. वांद्रे पूर्व येथील अतिक्रमण निर्मूलन मुख्यालयातही एक कनिष्ठ अभियंता व सहाय्यक नियुक्ती करण्यात आले आहेत.

या भरारी पथकाला सूचित प्रकरणांत स्थळ पाहणी करून जागेवरील दिसत्या परिस्थितीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल, हस्तनकाशा, छायाचित्रे यांसह संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडील मूळ दस्तऐवज तपासणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल अतिक्रमण निष्कासन विभाग प्रमुख कार्यालयास ७ दिवसांत सादर करायचा आहे, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -