शहाजी बापू पाटील यांनी केला खळबळजनक खुलासा…
सांगोला: शरद पवारांना (Sharad Pawar) ज्याला कुणाला राजकारणातून संपवायचे असल्यास ते त्यांना जवळ घेतात व राजकारणातून संपवून टाकतात, असं खळबळजनक विधान शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी केले आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्ष व इतर अनेक छोटे-मोठे पक्ष संपवून टाकले, असेही ते म्हणाले आहेत.
शहाजी बापू पाटील हे कायम आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. महाराष्ट्रात सरकार स्थापन होत असताना त्यांच्या एक डायलॉग खूप फेमस झाला होता. ‘काय डोंगार, काय झाडी. एकदम ओके’ या डायलॉगमुळे ते महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले होते. त्यानंतरदेखील त्यांची वक्तव्य कायम चर्चेत राहिली आहेत. आता त्यांच्या शरद पवारांवरील वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दलही खळबळजनक विधान केले आहे. अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचा प्लॅन होता की, शिवसेनेच्या आमदारांची संख्या १० ते १५ च्यावर जाऊ द्यायची नाही. तसेच आमचे ४० आमदार पाडण्याची तयारी अजित पवार व बाळासाहेब थोरातांनी केली होती, असा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे. तसेच आगामी निवडणुकीत माझे तिकीट कापण्याची तयारी देखील अजित पवारांनी केली होती, असे ते म्हणाले आहेत.
दरम्यान, यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हे देखील होते. शहाजी बापूंच्या मतदारसंघातील विविध विकासकामांचा शुभारंभ होत असून यानंतर माध्यमांशी बोलताना शहाजी बापूंनी ही खळबळजनक विधाने केली.