लोणावळा : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आपल्याला उद्योजक बनविण्याकरिता कटिबद्ध असून आपल्या समाजातील महिलांनी देखील सक्षम झाले पाहिजे असे सांगितले आणि तुम्ही उद्योजक झाला तर त्याचे मला समाधान मिळेल. कोळी समाजातून उद्योजक निर्माण व्हायला हवेत. केवळ मासेमारी नकोच तर माशांपासूनच्या विविध प्रक्रीया उद्योगातही सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. स्वयंरोजगार मेळावा आदिवासी कोळी व मच्छीमार समाजाने उद्योजक बनावे यासाठी आयोजित केला असल्याचे सांगून समाजाने आपली गरिबी नष्ट करण्याकरीता रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वात एकत्र येऊन आपली प्रगती करावी, असे मार्गदर्शन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.
ते भाजपा आणि कोळी महासंघ यांनी आयोजित केलेल्या स्वयंरोजगार मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्याला या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. नारायण राणे म्हणाले की, उद्योग हा माणसाला प्रगतीकडे घेऊन जातो. सुखी समाधानी, आनंदी जगायचं असेल आणि पुढील पिढी सक्षम करायची असेल तर उद्योगाशिवाय मार्ग नाही. मीदेखील १३ वर्षे नोकरी केली. पण मला कळलं की हे माझं काम नाही. दीड ते दोन हजार पगार मिळायचा. तोही घरी पोहचेपर्यंत मित्र भेटले की संपायचा. मी मुंबईत अनेक व्यवसाय केलेत. नारायण राणे हे नाव फार मोठं वाटते. पण मी छोटे अनेक व्यवसाय केले. मराठी माणूस आपले काम नाही म्हणून जो व्यवसाय करत नाही तोही केला. रस्त्यावर फटाके मटण, चिकनचा व्यवसाय केला.
माणसाला प्रगती करायची असेल तर लाज लज्जा बाळगून चालत नाही, असे मतही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.