Wednesday, July 2, 2025

यांना सुधारण्यात रस नाही....किरण रेड्डी यांचे काँग्रेसवर गंभीर आरोप

यांना सुधारण्यात रस नाही....किरण रेड्डी यांचे काँग्रेसवर गंभीर आरोप

आंध्रप्रदेश (वृत्तसंस्था): काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर अडचणीत आलेल्या काँग्रेसच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. आज आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण रेड्डी यांनीही सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर किरण रेड्डी यांनी काँग्रेस हायकमांडच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.


रेड्डी म्हणाले की काँग्रेस "चुकीचे निर्णय घेत आहे आणि त्यांची किंमत चुकवत आहे. खंत या गोष्टीची वाटते की त्यांना सुधारण्यात रस नाही. चूक झाली असेल तर ती मान्य करून ती सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. काँग्रेसमध्ये असे काही नाही. काँग्रेस हायकमांडच्या चुकीच्या निर्णयांमुळे पक्षाचा सर्वत्र पराभव होत आहे'', असे ते म्हणाले.

एखाद्या काँग्रेस नेत्याने पक्ष सोडताना हायकमांडवर प्रश्न उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गुलाम नबी आझाद यांनीही काँग्रेस सोडल्यानंतर राहुल गांधींवर खळबळजनक आरोप केले होते. दरम्यान, गेल्या ९ वर्षात जवळपास २३ बडे नेते काँग्रेसमधून बाहेर गेले आहेत. विशेष म्हणजे या सर्व नेत्यांनी काँग्रेस सोडण्यास राहुल गांधींना जबाबदार धरले आहे.

Comments
Add Comment