एका नागरिकाच्या सतर्कतेमुळे आले निदर्शनास, मुंबई महापालिकेने ठोठावला ७५ कोटींचा दंड
मुंबई : मुंबई महापालिकेच्या १८ फूट व्यासाच्या जलबोगद्याला भगदाड पडल्याने मुंबईकरांवर महिनाभर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे. एका बिल्डरच्या चुकीमुळे ही घटना घडली असल्याचे तपासात पुढे आले आहे. दरम्यान या घटनेची गंभीर दखल पालिकेने घेतली असून पाच महिन्यांत नासाडी झालेल्या पाण्याची रक्कम आणि दंड असे ७५ कोटी रुपये संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून वसूल करावे, असे पत्र पालिकेने ‘एमआयडीसी’ला पाठवल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.
वागळे इस्टेट या ठिकाणी बोअरवेल खोदत असताना मुंबई पालिकेच्या १८ फूट व्यासाच्या जलबोगद्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले आहे. तब्बल ५ महीने पाणी वाया गेले. या प्रकरणी एका नागरिकाने बांधकाम व्यावसायिकाविरोधात दिलेल्या तक्रारीनुसार ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या व्यावसायिकाची चूक मुंबईकरांना मात्र महागात पडली आहे.
भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास ७५ टक्के पाणीपुरवठा हा ५,५०० मिलीमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर लांब जलबोगद्याद्वारे होतो. या जलबोगद्याला ठाणे येथे बोअरवेल खोदकामादरम्यान भगदाड पडले होते.
या जलबोगद्याच्या दुरुस्तीसाठी मुंबईत तब्बल १ महिना १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, ही घटना का घडली याचा तपास करत असताना धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वागळे इस्टेट येथे बोअरवेल खोदत असताना बिल्डरला या पाइपलाइनचा अंदाज आला नाही. यामुळे मुंबई आणि ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या १८ मीटर व्यासाच्या जलबोगद्याला मोठे भगदाड पडले. यामुळे लाखो लिटर पाणी यादरम्यान वाया गेले. हा प्रकार येथील एका नागरिकाला समजल्यावर त्याने बिल्डर विरोधात तक्रार दिली.