बुलढाणा: एकीकडे महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट असताना बुलढाणा जिल्ह्यात पाण्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका आठ वर्षीय मुलीचा त्याच ७० फूट विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. काळजाला चटका लावणाऱ्या या बातमीने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या पाणी टंचाईवर कायमची उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी बुलढाणा अजिंठा महामार्ग आडवून धरला आहे.
देऊळघाट येथील एक आठ वर्षीय मुलगी पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली असता तिचा पाय घसरला आणि ती ७० फुट खोल विहिरीत पडली. यात गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने जिल्हा समान्य रुग्णाल्यात भरती करण्यात आलं. मात्र उपचाराच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. हा पाण्यासाठी जिल्ह्यातील पाहिला बळी गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अंजली भरत शेजोळ असे या मुलीचे नाव असून ती ज्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेली त्या विहिरीत आधी १० जण पडले आहेत. यातील नऊ जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. २५ हजार लोकसंख्या असलेल्या देऊळघाट परिसरात कायमची पाणीटंचाई असते. याबाबतीत वारंवार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देऊनही देऊळघाट वासियांची कायमस्वरूपी तहान भागविण्यात प्रशासनाला यश मिळाले नाही. त्यामुळे त्रस्त गावकरी आता मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहे.
वेळ पडल्यास पाणी कपातीचा निर्णय : गुलाबराव पाटील
मागील वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं धरणात समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळं सध्या फारशी पाणीटंचाई जाणवत नाही. मात्र वाढत जाणाऱ्या कडक पडणाऱ्या उन्हामुळं पाणी पातळीत झपाट्यानं घट होत आहे. त्यामुळ यावर्षी जर वेळेवर पाऊस नाही पडला तर पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता जरी पाणीटंचाई जाणवत नसली तरी परिस्थितीनुसार पाणी कपातीचा निर्णय घेतला जाईल, असं मत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे.