Monday, June 30, 2025

जुलाब, त्वचारोग आणि उलट्या....रोकडे चाळकऱ्यांच्या समस्या कधी संपणार?

जुलाब, त्वचारोग आणि उलट्या....रोकडे चाळकऱ्यांच्या समस्या कधी संपणार?

कल्याणमध्ये दुषित पाण्यामुळे नागरिकांना करावा लागतोय आजारांचा सामना


कल्याण : कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा येथील शिवाजी नगर, संतोषी माता मंदिर परिसरातील रोकडे चाळीत राहणारे नागरिक दुषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी पित आहेत. या गढूळ पाण्यामुळे नागरिकांना उलट्या, जुलाब आणि त्वचारोगांना सामोरे जावे लागत आहे. येथे टाकण्यात आलेली पाण्याची लाईन तब्बल ४० वर्षे जुनी असून एकदाही देखभाल न झाल्याने नागरिकांना या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे तसेच उपअभियंता सोनवणे यांना वारंवार तक्रार करूनही यात काहीच कारवाई होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.


शिवाजी नगर परिसरातील ही पाईपलाईन ड्रेनेज लाईन मधून गेली आहे. पाईपलाईन जुनी झाल्याने हि पाईपलाईन जीर्ण झाली असून यामध्ये ड्रेनेजचे पाणी झिरपते. हेच गढूळ पाणी नळाद्वारे नागरिकांच्या घरात येत असल्याने नागरिकांना हे गढूळ पाणी पिण्यावाचून पर्याय नाही.


पाहा नागरिक या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबद्दल काय सांगत आहेत....


या समस्येबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला वारंवार तक्रार करून देखील पालिका अधिकारी लक्ष देत नसल्याने नागरिकांनी याबाबत शिवसेना उपशहर प्रमुख नगरसेवक मोहन उगले यांच्याकडे समस्या मांडल्यावर पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून हि समस्या निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले आहे.


याबाबत कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांना विचारले असता, पाईपलाईनला अनेक ठिकाणी अनधिकृतरित्या टॅपिंग केल्याने ड्रेनेज मधील पाणी याठिकाणी झिरपत असून नागरिकांची हि समस्या तात्काळ निकाली काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment