छत्रपती संभाजी नगर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणुकीवेळी भाजपात केव्हा जातील? तसेच काल नाना पटोले महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला का हजर नव्हते? याबाबत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी गौप्यस्फोट केला आहे. तसेच १५ दिवसांच्या आत ठाकरे गटांतील अनेक आमदार शिवसेनेत येतील असा दावाही शिरसाट यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यानुसार येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तशा हालचाली सुरु आहेत असंही संजय शिरसाट म्हणाले. एवढ्या मोठ्या नेत्याला काँग्रेसमध्ये वागणूक योग्य मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळं ते भाजपमध्ये जातील असे शिरसाट म्हणाले.
दरम्यान, काल महाविकास आघाडीच्या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित नव्हते. यावरुनही आमदार शिरसाट यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. काल झालेली सभा वज्रमुठ सभा नव्हती. नाना पटोले काल आजारी होते म्हणून आले नाहीत असे सांगत आहेत मग आज ते कोर्टात कसे गेले, यावरुनच महाविकास आघाडीत काय सुरू आहे ते दिसत आहे, असंही संजय शिरसाट यावेळी म्हणाले.