Wednesday, March 19, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यगगनबावडा घाटाकडे लक्ष कोण देणार...?

गगनबावडा घाटाकडे लक्ष कोण देणार…?

  • रवींद्र तांबे

सध्या मुंबई-गोवा या ६६ नंबरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चालू असल्याने कोकणात जाणाऱ्या सर्रास गाड्या गगनबावडा घाटाने जात असतात. या गाड्या पुणेमार्गे गगनबावडा घाटामधून वैभववाडीतून तळेरे या ठिकाणी येऊन पुन्हा मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाला मिळतात. त्यामुळे यामार्गे टोलचा जादा भार पडत असला तरी वाहतूक सुरळीत होत असते. मात्र गगनबावडा घाटाचा विचार करता, स्थानिक भाषेत सांगायचे झाल्यास पूर्ण घाटातील रस्त्याची चाळण झालेली दिसून येते. पुढील दोन महिन्यात पावसाला सुरुवात होईल. आता उन्हाळा असूनसुद्धा अवकाळी पाऊस पडतो. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. कारण या घाटातून प्रवास करणे धोकादायक झालेले आहे. पावसाळ्यात तर भरपूर पाऊस पडत असल्यामुळे दरडी कोसळतात. त्यामुळे काही दिवस वाहतूक बंद करावी लागते. तेव्हा दरड कोसळू नये या दृष्टीने काम करावे लागेल. त्यासाठी त्या क्षेत्रातील माहीतगार व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली सर्व्हे करून त्यावरती कायमस्वरूपी कसा तोडगा काढता येईल याचा विचार व्हायला पाहिजे. केवळ दर वर्षी मलमपट्टी लावून काम करण्यापेक्षा एकदाच खर्च केल्यास वाहतूक सुरळीत होऊ शकते. त्यासाठी संबंधित खात्याला पारदर्शक काम करावे लागेल.

मी, दोन महिन्यांपूर्वी या घाटातून प्रवास केला होता. उन्हाळ्यात ही घाटाची परिस्थिती, मग पावसाळ्यात काय होईल. उन्हाळा असूनसुद्धा रस्त्याच्या बाजूचे गवत काढलेले नाही. त्यात बारीक खडी बाजूला काही अंतरावर टाकलेली. समोरून वाहन आल्यावर बऱ्याच वेळा मी ज्या गाडीत होतो, त्या गाडीचालकाने गाडी उभी केली होती. घाटातील रस्ता अतिशय जीर्ण झालेला, मध्ये खड्डे, अरुंद वळणावर एका बाजूला रस्ता खचलेला, बाजूचा कठडा तुटलेला त्याला लावण्यात आलेल्या जाळ्यासुद्धा तुटलेल्या म्हणजे त्यांची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे. कारण घनदाट डोंगरामधून नागमोडी वळणे घेत गाड्या जात असतात. पावसाळ्यात तर फारच आकर्षक म्हणजे हिरवळ प्रवाशांचे लक्ष वेधून घेते. त्याची वेगळीच मजा प्रवाशांना घेता येते. हेच खरे कोकणचे मुख्य आकर्षण आहे. तेव्हा घाटातील रस्ता व्यवस्थित करणे, रस्त्याच्या बाजूचा कठडा मजबूत करणे, वळणाला असलेली नावे ठळक अक्षरात लिहिणे, रस्त्यावर आलेली झाडे कटिंग करणे, मोऱ्या व्यवस्थित करणे, ठिकठिकांणी प्रवाशांची बसण्याची सोय, त्यांना चहा, पाणी, नाश्ता यांची उत्तम सोय असावी. त्यासाठी छोटेखानी हॉटेल असावे.

घाटातील प्रवाशांची सुरक्षा व मार्गदर्शक म्हणून स्थानिक तरुणांची ‘घाट रक्षक’ म्हणून नियुक्ती करावी. तेवढा प्रवाशांना आधार व पोलिसांना घाटात एखादी घटना घडल्यास लागलीच सांगणे. त्यामुळे पोलीस त्वरित योग्यती अंमलबजावणी करू शकतात. त्यासाठी त्यांची नेमणूक करून त्यांना ड्रेसकोड द्यावा. तेवढाच त्यांना पण आर्थिक लाभ होऊन प्रवाशांचा पण ओढा निर्माण होऊ शकतो. यासाठी आसपासच्या गावच्या सरपंचांनी पुढे येणे गरजेचे आहे. कारण घाट म्हटला की, निसर्गरम्य वातावरण आणि थंडगार हवा त्यामुळे निसर्गाच्या कुशीतून गाडी चालविताना वाहनचालकांची कसरत होत असते. तेवढाच प्रवाशांनासुद्धा आनंद लुटता येतो. त्यात वेडीवाकडी वळणे, मध्ये ससा, हरण, गवा रेडा, डुक्कर व माकडे यांचे दर्शन झाल्याने प्रवासी अधिक आनंदित दिसतात. इतकेच नव्हे तर घनदाट जंगल असल्याने झाडांच्या सावलीतून गाडी जात असताना त्याचा आनंद काही वेगळाच असते. यासाठी कोणी जर या घाटातून प्रवास केलेला नसेल, तर जरून एकवेळ प्रवास करावा. समोरच्या टेकड्या पाहून मनाचे पूर्ण समाधान होईल. त्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की हा रस्ता कसा बनविला असेल? याचा शिल्पकार कोण? असे अनेक प्रश्न निर्माण होतील. घाटातून रस्ता कसा काढायचा, हे मेंढपाळण करणाऱ्या व्यक्तीने दाखविले, असे जाणकार सांगतात.

कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्हा यातील जोडणारा दुवा म्हणजे गगनबावडा घाट होय. यामुळे ये-जा करताना सुद्धा अगदी कमी वेळात प्रवास करू शकतो. बऱ्याच वेळा सिंधुदुर्गातील व्यक्ती जास्त आजारी असेल. तर जिल्ह्यात चार-पाच दिवस उपचार झाल्यावर, नंतर बरे वाटत नसेल, तर त्याला तातडीने कोल्हापूर, मुंबई किंवा पणजीला डॉक्टर घेऊन जायला सांगतात. अशा वेळी कोल्हापूर किंवा मुंबईला जाण्यासाठी हा मार्ग उपयुक्त ठरतो. मात्र या मार्गाची झालेली दशा पाहून अनेक पेशंट मुंबईला आणताना आंबा घाटातून जातात. याचा अर्थ असा की, हा घाट वाहतुकीसाठी योग्य नाही, असे म्हणता येईल.

थोडक्यात असे म्हणता येईल की, गगनबावडा घाटाची झालेली दुर्दशा पाहून प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. कारण गगनबावडा घाट हा कोकणच्या विकासाला चालना देणारा आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून पावसाळ्यापूर्वी गगनबावडा घाटातील रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -