कणकवली: भाजप आमदार नितेश राणे यांनी कणकवलीतील सावरकर गौरव यात्रेची माहिती देताना उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला. वीर सावरकर यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या राहुल गांधी यांना अडविण्याची हिम्मत मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्यात नव्हती. आता सत्ता गेल्यानंतर ते ठणकवण्याची भाषा करीत आहेत. ही त्यांची नौटंकी असल्याचा वार नितेश राणे यांनी केला आहे.
कणकवली शहरात ५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून कणकवलीत भगवे वादळ निर्माण केले जाणार असल्याचीही माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.
कणकवली येथे आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, भाजप कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, दामोदर सावंत आदी उपस्थित होते.
नितेश राणे म्हणाले, राहुल गांधी, नाना पटोले आणि काँग्रेसची मंडळी वीर सावरकर यांचा सातत्याने अपमान करत आहेत. त्यांना योग्य तो संदेश देण्यासाठी आम्ही ५ एप्रिल रोजी कणकवलीत भव्य अशी वीर सावरकर गौरव यात्रा काढणार आहोत. या यात्रेमध्ये सावरकर यांचा रथ असणार आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकर यांच्याविषयी केलेल्या भाषणांची चित्रफित दाखवली जाणार आहे. यात शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि सर्व जनतेने सहभाग घ्यावा असे आवाहनही नितेश राणे यांनी केले.