कोल्हापूर: राहुल गांधी यांची केवळ खासदारकी काढून घेऊन थांबू नका, जसा अजमल कसाब वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला, तसा राहुल गांधी यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना पाकिस्तानात हाकलून द्या, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईला विरोधी पक्षांकडून विरोध होत असताना आमदार नितेश राणे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
नितेश राणे पुढे म्हणाले, मोदी नावाचे सगळे चोर आहेत असे बोलायला आणि ओबीसी समाजाची, देशाची बदनामी करायला भाजपने सांगितले नव्हते. तसेच न्यायलायात गेलेला माणूसही भाजपचा नव्हता. बदनामी राहुल गांधी यांनी करायची आणि आता कायद्याने काम केलं की भाजपच्या नावाने बोंबलायचं हा कुठला नियम? यापेक्षा राहुल गांधींना भाषण येत नसेल तर थोबाड बंद करायला सांगा, अशी असं टीकास्त्रही नितेश राणे यांनी डागलं.
राज्यात वाढत असलेल्या लव्ह जिहाद विरोधात विधिमंडळात आवाज उठवला जात आहे. विविध जिल्ह्यात हिंदुत्ववाद्यांचे मोर्चे निघत आहेत. लव्ह जिहादपासून मुलींना वाचवण्यासाठी आणि ते कशाप्रकारे मुलींना अडकवतात याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. लव्ह जिहाद विरोधात कायदा आला तर तो कसा वापरायचा हेही लोकांना कळायला हवं, यासाठी मी व्याख्यानमाला घेत असल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
तसेच काही जिहाद्यांकडून हिंदू समाजाची लोकसंख्या कशी कमी होते याचे प्रयत्न होत असतात. याबाबत मी भाषणात केलेले वक्तव्य हे सत्याच्या आधारावर केले आहे. राज्यात जे काही मुस्लिम समाजाचे अनधिकृत बांधकाम पाडले गेले, हे जाणीवपूर्वक होत असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. मात्र, इम्तियाज जलील राज्यात जो लँड जिहाद सुरू आहे, त्याला स्क्रिप्टेड किंवा राजकीय रंग देऊन झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी नितेश राणे यांनी केला.