माहीम येथील अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने केले निष्कासित
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात माहीम भागात अनधिकृत बांधकाम झाल्याचे म्हटले होते. तसेच एक महिन्यात बांधकाम हटवले नाहीतर त्याठिकाणी गणपती मंदिर बांधू असा इशाराही त्यांनी दिला होता. यानुसार रातोरात चक्रे हलली आणि पालिकेने जेसीबीच्या सहाय्याने हे बांधकाम निष्कासित केले. जिल्हाधिकाऱ्यांनी हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. पोलीस बंदोबस्तामध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली.
प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे गेल्या २ वर्षात समुद्रात कथित मजार उभारण्यात आली. माहीम दर्गाच्या मागे काही वर्षांपासून समुद्रात नवीन हाजीअली तयार करण्याचे काम सुरू होते, असा आरोप राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत केला होता.
हे प्रकरण संवेदनशील असल्याने कारवाईवेळीची कोणतीही दृष्य दाखवण्यात आलेली नाहीत. आता माहीम समुद्र किनाऱ्यावरील पोलीस बंदोबस्तामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, तोडकाम पूर्ण झाल्याचं मनसे नेत्यांना प्रशासनाकडून कळवण्यात आले. प्रशासनाने ही तातडीने दखल घेतल्याबाबत मनसेने प्रशासनाचे कौतुक केले आहे. त्याचसोबत इतर ठिकाणीही अशी बांधकामे होत असतील तर त्याठिकाणी कारवाई व्हावी. तसेच त्या जागेवर पुन्हा असे बांधकाम होणार नाही याची दक्षता प्रशासनासोबत स्थानिकांनीही घ्यावी. यापुढे असे होऊ नये हे सगळ्यांनीच पाहिले पाहिजे, असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी म्हटले आहे.