कल्याण : शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेचे रूपांतर करून २०१६-१७ पासून स्मार्ट ग्राम योजना सुरू करण्यात आली. पण याला आर. आर.(आबा)पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना असे नाव देण्यात आले. सन२०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा ठाणे जिल्ह्यातील सुंदर गाव हा सुमारे ५० लाखांचा पुरस्कार कल्याण तालुक्यातील ‘जांभूळ’ ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे.
ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक गुण प्राप्त केल्यामुळे ‘सुंदर गाव’ म्हणून जांभूळ ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. ऐतिहासिक अशा कल्याण नगरीतील पंचायत समितीच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. तर आम्ही जांभुळकर, ग्रामस्थ, उपसरपंच, सदस्य, कर्मचारी, कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांच्या सर्वाच्या सहकार्याने हे सुवर्ण क्षण पाहायला मिळतात, अशी भावना ग्रामपंचायतीचे सरपंच परिक्षित पिसाळ यांनी व्यक्त केली.
प्रारंभापासूनच कल्याण पंचायत समितीच्या अंतर्गत येणारे जांभूळ हे गाव आदर्श गाव म्हणून तालुक्यात नावारूपाला येत आहे. गावचे नेतृत्व शांत, संयमी, हुशार, समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन चालणारे असल्यानंतर काय बद्दल घडू शकतो, याचे ताजे उदाहरण म्हणजे जांभूळ गाव आहे. याच गावाने आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळवले आहेत. गावातील सर्व घटकांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध सोईसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या आर. आर. (आबा) पाटील जिल्हा सुंदर गाव योजनेत सहभाग घेतला.
ठाणे जिल्ह्यातील भिंवडी, कल्याण, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ पंचायत समित्यांच्यामधून ‘तालुका सुंदर गाव ’योजनेतंर्गत सन२०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी तालुक्यातून एका गावाची घोषणा करण्यात आली होती. तर तालुका तपासणी समितीने केलेल्या तपासणीच्या अनुषंगाने प्रगती केली असेल तर त्यास त्याप्रमाणे गुण देऊन सदर पुर्नमूल्यांकनामधून सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या ग्रामपंचायतीस आर. आर.(आबा) पाटील‘जिल्हा सुंदर गाव’, घोषित करण्यात येते. यामध्ये शहापूरमधून भावसे ग्रामपंचायत, भिंवडी, कुसापूर, अंबरनाथ साई, मुरबाड पेंढरी आणि कल्याण तालुक्यातून जांभुळ या गावाचा समावेश झाला होता. यामध्ये जांभुळ ग्रामपंचायतीने सर्वाधिक गुण मिळवले. स्वच्छता १९, व्यवस्थापन २३, दायित्व १२, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण २०, पारदर्शकता व तंत्रज्ञान १४ असे एकूण ८८ गुण प्राप्त करून जांभूळ ग्रामपंचायतीने प्रथम गुणानुक्रमांक मिळवला आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिदंल अध्यक्ष असलेल्या समितीने ५० लक्ष रुपयांचा प्रथम पुरस्कार जांभूळ ग्रामपंचायतीस जाहीर केला आहे. या पुरस्कारामुळे संपूर्ण कल्याण तालुक्यासाठी अभिमानाची ही बाब असून हा दिवस सुवर्ण दिन आहे. याआधीही या गावास संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचाही जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला होता.
जांभूळ ग्रामपंचायतीला ८८ गुण
स्वच्छता १९, व्यवस्थापन २३, दायित्व १२, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण २०, पारदर्शकता व तंत्रज्ञान १४ असे एकूण ८८ गुण प्राप्त करून जांभूळ ग्रामपंचायतीने प्रथम गुणानुक्रमांक मिळवला आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल अध्यक्ष असलेल्या समितीने ५० लक्ष रुपयांचा प्रथम पुरस्कार जांभूळ ग्रामपंचायतीस जाहीर केला आहे.