आपल्याकडे आर्थिक साक्षरता बेताची असते आणि आर्थिक जगतात जे काही चाललेले असते, त्यावर फार थोड्यांचे लक्ष असते. अर्थशास्त्र आपल्याकडे सर्व शाखांना बंधनकारक नाही. त्यामुळे अमेरिकेतील सोळाव्या क्रमांकाची मोठी बँक सिलिकॉन व्हॅली बँक दोन दिवसांपूर्वी कोसळली, तेव्हा अमेरिकेत भूकंपाचा धक्का बसला, पण भारतात त्याची कुणी दखलही घेतली नाही. केवळ राजकीय विषयांपुरती चर्चेची पातळी ज्यांची आहे, अशा खासदारांनी भरलेल्या संसदेतही या एसव्हीबी बँक कोसळण्याच्या घटनेचे पडसाद उमटले नाहीत. पण, अमेरिकेतील एसव्हीबी बँक कोसळण्याची घटना ही साधीसुधी नाही. २००८ मध्ये अमेरिकेत लेहमन ब्रदर्स कोसळल्यानंतर जी महामंदीची लाट आली, त्यानंतर ही दुसऱ्या क्रमांकाची तशीच घटना आहे. भारतीय बँकिंग व्यवस्था ही रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली खूपच नियमित असून त्यामुळे भारतीय बँकांवर या घटनेचा परिणाम होणार नाही, अशी ग्वाही भारतीय तज्ज्ञ देत आहेत.
लेहमन ब्रदर्स कोसळल्यानंतरही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत राहिली होती. अर्थात इतक्या मोठ्या घटनेचा शेअर बाजारावर परिणाम होणारच नाही, असे गृहीत धरणे चुकीचेच आहे.त्यामुळे भारतीय शेअर बाजाराला एसव्हीबी बँक कोसळण्याचा फटका बसलाच. भारतीय शेअर्स धडाधड कोसळले आणि भारतीय गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले. वास्तविक एसव्हीबी बँक कोसळली, ती तेथील गुंतवणूकदारांनी भराभर बँकेतील ठेवी परत काढून घेतल्यामुळे. याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर होणे अपेक्षित होते. कारण, अमेरिकेतील बँकेतील गुंतवणूक काढून घेतली की, आकर्षक अशा भारतीय शेअर बाजारात गुंतवली जाते. मात्र शेअर बाजार कोसळला, कारण एसव्हीबी बँक प्रकरणामुळे मोठा आर्थिक पेचप्रसंग निर्माण होईल, या भावनेमुळे. कारण शेअर बाजार हा तर निव्वळ भावनेवर चालतो. एसव्हीबी बँक मूलतः ही जगभरातील स्टार्ट अप्सना कर्जपुरवठा करणारी बँक होती. त्यामुळे तीच बंद झाल्यावर भारतातीलही स्टार्ट अप्सवर त्याचा परिणाम होणारच आहे. अनेक स्टार्टअप्ससाठी आता निधी मिळवणे जास्तच अवघड होणार आहे. पण प्रत्यक्षात बँकिंग क्षेत्रावर त्याचा परिणाम होणार नाही. टेक स्टार्ट अप्सवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणारी एसव्हीबी बँक असल्याने स्टार्ट अपच्या इकोसिस्टिमवर म्हणजे परिसंस्थेवर याचा विपरित परिणाम तर होणारच आहे. अमेरिकेसारखा संपन्न आणि जागतिक पुढारलेला विकसित देश असल्याने एसव्हीबी बँक कोसळल्यामुळे तेथे काही हलकल्लोळ उडाला नाही. कुणी मोर्चे काढले नाहीत आणि अर्थमंत्र्यांचा राजीनामा मागितला नाही. विरोधी पक्षांनी सरकारवर बँकिंग क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला नाही. उलट बिडेन प्रशासनाने येत्या सोमवारपासून ठेवीदारांनी उर्वरित ठेवी घेऊन जाव्यात, असे जाहीर केले.
इंग्लंडने सिलिकॉन व्हॅली बँक कोसळल्यामुळे आपले नुकसान कमीत कमी कसे होईल, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँकेचे कोसळण्याचे प्रकरण जितके खळबळ उडवणारे आहे, तितकेच ते मनोरंजकही आहे. अत्यंत विजेच्या वेगाने या दोन्ही बँका कोसळल्या आणि ठेवीदारांनी आपापल्या ठेवी विद्युत वेगाने काढून घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी कोणतीही अफवा कारण ठरली नव्हती. जेव्हा खूप मोठ्या संख्येने ठेवीदार आपल्या ठेवी बँकेतून काढून घेतात, तेव्हा त्या बँकेकडे किमान आवश्यक खेळते भांडवल आणि राखीव निधी म्हणजे वर्किंग कॅपिटल आणि रिझर्व्ह फंड राहात नाही. परिणामी ती कोसळते. पण कोणतीही व्यापारी बँक कोसळते ती अत्यंत जास्त कर्जे दिल्याने आणि ती बुडीत निघाल्याने. पण, येथे हे कारण नव्हते, तर दुसरी दोन प्रमुख कारणे होती. एक म्हणजे व्याज दराची जोखीम आणि तरलता म्हणजे लिक्विडिटी जोखीम जी प्रत्येक बँकेला सतावतच असते. जेव्हा व्याजदर प्रचंड वेगाने आणि अल्पकाळात वाढतात, तेव्हा व्याजदराची जोखीम तयार होते. अमेरिकेत २०२२ पासून हेच होत आहे आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने वाढती महागाई कमी करण्यासाठी या कालावधीत तब्बल ४.५ प्रतिशत गुणांनी व्याज दर वाढवले आहेत. परिणामी, दिलेल्या कर्जाची थकबाकी प्रचंड वाढली. पण, अशी बँक जर आपल्या सिक्युरिटीज मुदत पूर्ण होईपर्यंत टिकवून ठेवू शकल्या, तर या जोखमीचा फारसा परिणाम होत नाही. जास्त तांत्रिक बाबीत जायला नको. पण, इतकेच की, ही जोखीम फारशी नव्हती. पण, दुसरी जी जोखीम होती, ती महत्त्वाची होती. जेव्हा बँकेला तोटा न होता आपल्यावरील शर्ती पूर्ण कराव्या लागतात, तेव्हा तरलता जोखीम आकार घेते. अगदी सोप्या भाषेत समजावून सांगायचे, तर तुम्ही जर अमेरिकेतील घर खरेदी करण्यासाठी ठरावीक रक्कम पाठवली आणि तुम्हाला त्याचवेळेस तेथील एक दुकानही आवडले, तर तुम्ही ते घेऊ शकत नाही. कारण तुमची रक्कम घरात अडकलेली असते. ठेवीदारांनी आपल्या ठेवी इतक्या प्रमाणात काढून घेतल्या की, बँकेकडे राखीव रोख निधी म्हणजे सीआरआर जो असावा लागतो, त्यापेक्षाही कमी पैसा उरला. म्हणून बँकेला आपल्याकडील सिक्युरिटीज विकण्याची पाळी आली. या दोन्ही कारणांमुळे एसव्हीबी बँक कोसळली आणि अखेरीस त्याचे परिणाम भारतातील स्टार्ट अप्सना काही प्रमाणात तरी सोसावे लागणार आहेत. भलेही ते अल्पकाळ असतील, पण अगोदरच खराब अर्थव्यवस्थेशी झुंजणाऱ्या भारतासाठी ही काही चांगली घटना नाही.
नवी दिल्ली: आयपीएलच्या (IPL 2025) पहिल्या विजेत्या राजस्थान रॉयल्सवर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला आहे. लखनौ…
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…