Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीशेतकऱ्यांनो चिंता नको, जे नुकसान होईल, ते भरून देऊ

शेतकऱ्यांनो चिंता नको, जे नुकसान होईल, ते भरून देऊ

गोपीनाथ गड स्मारकावरील पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

अवकाळी पावसाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांचे ठाम आश्वासन

सिन्नर (प्रतिनिधी): ‘राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळतो आहे. पण शेतकऱ्यांनो घाबरू नका, अवकाळी पावसामुळे जेवढे नुकसान होईल, तेवढे आम्ही भरून देऊ’, असे ठाम आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. ‘सर्वत्र अवकाळी पाऊस कोसळत आहे. पण शेतकरी बांधवानो काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत’, असे शिंदे म्हणाले.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात नांदूरशिंगोटे येथे दोन एकर परिसरात गोपीनाथ गड उभारण्यात आला आहे. येथे मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, ‘आजही गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारी जनता शुभ कार्याची पत्रिका गोपीनाथ गडावर नेतात. ती श्रद्धा, प्रेम आहे. ज्यांनी चांगले काम केले असे राज्यात अनेक नेते आपण पाहिले व ते लोकनेते म्हणून प्रसिद्ध झाले. गोपीनाथ मुंडे हे लोकनेते बिरुदाचे मुकुटमणी होते. त्यांनी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी अहोरात्र काम केले. कोणाला आवडो न आवडो, ते परखड बोलणारे होते, सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. ७० च्या दशकात सायकलवर शबनमची झोळी घेऊन पायी फिरून भाजप वाढविण्याचे काम त्यांनी केले. भाजप – शिवसेना युतीचे शिल्पकार गोपीनाथ मुंडे होते’, असे गारवेद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

‘शिंदे पुढे म्हणाले की, ज्या ज्या वेळी अडचणींचा संघर्षाचा काळ होता, त्या त्यावेळी बाळासाहेब ठाकरे त्यांना मार्गदर्शन करत असायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांचे प्रेम होते. बाळासाहेबांचेही मुंडेंवर प्रेम होते. मुंडे यांच्या काळात संघर्ष होता. जेव्हा जेव्हा अडचणीचा काळ आला, तेव्हा बाळासाहेब प्रेमाचा सल्ला देत होते. लोकनेता अकाली जाईल, असे कोणाला वाटले नव्हते. ते गेले तो काळा दिवस होता. त्यांनी जे समाजासाठी काम केले, त्यामुळे शेवटच्या दिवशी जिकडे – तिकडे माणसे वणव्यासारखी धावत होती. त्यांचे वक्तृत्व – कर्तृत्व शिकण्यासारखे आहे. ते बोलत असताना सन्नाटा असायचा. माणसे जोडण्यासारखी ताकद मुंडे यांच्याकडून शिकण्यासारखी होती’, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी अठरापगड जातींसाठी काम केले. गोपीनाथ मुंडे हे आपल्या कामामुळे लोकनेते या बिरूदाचे मुकुटमणी होते, असे प्रतिपादन शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ‘हे सरकार शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांवर चालणारे असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आश्वासन देत अवकाळी पाऊसाने झालेल्या नुकसानीची भरपाई शासन देणार ’, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला. राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना नजरेसमोर ठेवून योजना आखल्या आहेत. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत भरघोस तरतुदी केल्या आहेत. उसतोड कामगारांच्या मुलांसाठी प्रमुख शहरांमध्ये वसतीगृह उभारण्यात येतील. उसतोड कामगार महामंडळास निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे आश्वासन देऊन स्व. गोपीनाथ मुंडे यांना विनम्र अभिवादन केले.

स्व. मुंडेंच्या विचारांचा वारसा पुढे नेऊ…

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर होते. समाजातील तळागाळातील नागरिकांसाठी ते योद्धे होते. दलित, पिडीत, शोषित, गरीब समाजाला न्याय देण्यासाठी आपले आयुष्यपणास लावले. कृष्णाखोरे, तापी पाटबंधारे विदर्भ सिंचनाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले. मानवतेच्या, एकतेच्या, समतेच्या आधारावर सर्व समाजाचा विकास होण्यासाठी गोपीनाथरा मुंडे प्रयत्नशील होते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना शेतक-यांच्या मुलांसाठी विविध योजना राबवाव्या लागतील. शेतकरी अन्नदाताबरोबरच उर्जा दाता बनला पाहिजेत. स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट व्हिलेज ही संकल्पना अंमलात आणणे गरजेचे आहे. असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

अहमदनगरमध्ये गोपीनाथ गड उभारणार : राधाकृष्ण विखे – पाटील

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आजच्या स्मारकामुळे गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला असून असा नेता पुन्हा होणार नाही. स्व.गोपीनाथ मुंडेंच्या स्मरणार्थ अहमदनगर जिल्ह्यात गोपीनाथ गडाची निर्मिती करणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी सांगितले.

सर्वांना न्याय हीच मुंडेंना श्रद्धांजली : छगन भुजबळ

माजी मंत्री तथा आमदार छगनराव भुजबळ म्हणाले की, लोकांसाठी काम केलेल्या व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी हजारो लोक स्वयंस्फूर्तीने येत असतात. बहुजनांना एकत्र आणण्याचे काम गोपीनाथराव मुंडे यांनी केले असून, ओबीसींची गणना झाली पाहिजे, मंडल आयोगाची अमलबजावणी झाली पाहिजेत यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले. सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका घेणे, हीच स्व. गोपीनाथराव मुंडे यांना खरी श्रध्दांजली ठरेल असे त्यांनी सांगितले.

मुलांसाठी वसतीगृह उभारावे : पंकजा मुंडे

माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, भगवान बाबांची भक्ती, शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार आचरणात आणणारे, गोरगरीब जनतेसाठी झटणारे गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक उभे राहत आहे, याचा अभिमान आहे. स्व. मुंडे आणि गडकरी यांची काम करण्याची पध्दत एकसारखी होती. या दोघे ज्येष्ठ नेत्यांचा विकासाचा वारसा पुढे चालवू असे आश्वासित करून गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ उसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृह, औरंगाबाद येथे दवाखाना उभारा, असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी यावेळी केले. राजकारण व काम एकत्र न आणता काम करणारे स्व. गोपीनाथराव मुंडे सर्व पक्षात लोकप्रियतेत आघाडीवर असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय सांगळे यांनी तर उपस्थितांचे आभार माजी आमदार प्रकाश वाजे यांनी मानले. कार्यक्रमास राज्यभरातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार प्रितम मुंडे, खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री छगनराव भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजाताई मुंडे, आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, माणिकराव कोकाटे, देवयानी फरांदे, मोनिका राजळे, सुहास कांदे, हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जि.प च्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शितल सांगळे, माजी आमदार प्रकाश वाजे, उदय सांगळे, हेमंत धात्रक आदि मान्यवर उपस्थित होते.

पाऊस आशीर्वाद देऊन गेला : मुख्यमंत्री

आज कार्यक्रम सुरु असताना पाऊस आला. सर्वत्र अवकाळी पाऊस कोसळत आहे. पण शेतकरी बांधवानो काळजी करू नका, आम्ही सोबत आहोत. राज्यातील अनेक भागात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी सर्व ठिकाणी वसतिगृह तयार होतील. तुम्ही सांगितले की मुंडे यांच्या नावाने हॉस्पिटल उभे करायला हवे, पण मुंडे यांच्या नावाने स्मारक पण होईल आणि रुग्णालये सुद्धा होतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -