मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांवर ‘गद्दार’ म्हणून टीका करणारे ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी २००४ साली शिवसेना पक्ष सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण, २०१९ साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ‘रामराम’ ठोकत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. यावर आता भास्कर जाधव यांनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्याची सल व्यक्त केली. त्यावेळी आपला निर्णय चुकला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडायला नको होता, असे आता ते जाहिरपणे म्हणत आहेत. ते ‘झी २४ तास’च्या ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ कार्यक्रमात बोलत होते.
भास्कर जाधव म्हणाले, “माझ्या आयुष्यात शिवसेना कधी सोडेन असे वाटले नव्हते. पण, नियतीच्या निर्णयापुढे आपण फिके पडतो. म्हणून मला शिवसेना सोडावी लागली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडायला नको होता. हे आजही आणि उद्याही कबूल करेन. या पक्षातून त्या पक्षात जाणे हे कदापीही चांगले नाही.”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का सोडला? असे विचारले असता भास्कर जाधवांनी सांगितले, “त्याबाबत कधीही भाष्य केले नाही. पक्ष सोडण्यासाठी कोणाला दोष दिला नाही अथवा टीका-टिप्पणी केली नाही. शिवसेना सोडली, तेव्हा एका शब्दानेही टिप्पणी केली नाही. एकंदरीत परिस्थिती पाहता राष्ट्रवादी सोडण्यासाठी सबळ कारण नाही.”