आमदार नितेश राणे यांची मागणी
मुंबई (विशेष प्रतिनिधी): महाराष्ट्रातल्या गोरगरीब तरुण मुलींचे आयुष्य खराब करणाऱ्या लव्ह जिहाद तसेच धर्मांतराला बंदी घालणारा सक्षम कायदा महाराष्ट्र सरकारने तयार करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत केली.
अर्थसंकल्पावरील विभागवार चर्चेत महिला आणि बाल विकास विभागावर ते बोलत होते. महाराष्ट्र सरकारने स्तुत्य पाऊल उचलत लेक लाडकी, ही योजना आणली आहे. अत्यंत चांगली योजना आहे. जन्मापासून १८ वर्षांपर्यंत मुलीला आर्थिकदृष्ट्या मदत होण्यासाठी अत्यंत उपयोगी असलेली अशी ही योजना आहे. घरात मुलगी होते, त्यामुळे एक आनंदाचे वातावरण तयार होते. पण अठरा वर्षानंतर समाजामध्ये या मुली जेव्हा वावरतात तेव्हा त्यांच्याकडे लव्ह जिहाद तसेच धर्मांतर करणाऱ्या लोकांकडून वाकड्या नजरेने पाहिले जाते हे वाईट आहे आणि यावरच आता विचार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात लाखाहून जास्त लोकांचे हिंदू आक्रोश मोर्चा निघत आहेत. कशासाठी? लव्ह जिहाद तसेच धर्मांतर विरोधात कायदा या राज्यात तयार व्हावा याकरीता हे मोर्चे काढले जात आहेत. आज समाजामध्ये या मुली वावरत असताना कोणी त्यांच्या विरोधामध्ये षडयंत्र रचत असेल, या कोवळ्या मुलींचे आयुष्य खराब करत असेल तर आम्हाला गप्प बसून राहता येणार नाही. एकेठिकाणी मुलींसाठी चांगल्या योजना आणायच्या आणि त्याच वेळेला समाजामध्ये दुसरीकडे लव्ह जिहादसारखी कीड आपण चालू ठेवायची हे योग्य नाही. आज लहान मुलींची लग्ने करतात. लग्न करताय, करा… पण धर्मांतराची गरज काय? महाराष्ट्र सरकारने यासाठी एक इंटरफेस मॅरेज कमिटी नेमली आहे. या कमिटीवर काही जणांनी टीका केली. कोणीही कोणाशी लग्न करू शकते, त्याला तसा अधिकार आहे, त्यांना असे रोखणे योग्य नाही, असे हे लोक म्हणत आहेत. आम्ही कुठे म्हणतो की कोणी कोणाशी लग्न करू नये… कोणी कोणाशीही लग्न करावे, पण त्यांचे आयुष्य खराब होत असेल, या मुलींचे आयुष्य अंधारात टाकले जात असेल तर ते टाकले जाता कामा नये. खोटे बोलून लग्न करायचे, नंतर धर्मबदल करण्यासाठी सक्ती करायची. तसे ऐकलं नाही तर तुला आणि तुझ्या मुलांना घराबाहेर काढले जाईल असे धमकवायचं, हे सगळं चालून घेतलं जाणार नाही, असेही राणे म्हणाले.
अफझल शेखला एमपीडीए लावा
त्याआधी सकाळच्या सत्रात नितेश राणे यांनी लव्ह जिहाद विषयाशी संबंधित असलेल्या एका लक्षवेधी सूचनेवर चर्चा केली. नगर जिल्ह्यातील रामवाडी परिसरातील एका बहुसंख्य समाजावर एका विशिष्ट समाजाकडून अत्याचार होणे, त्यांना पलायन करण्यास भाग पाडणे, रामवाडीचे नाव हिमायतनगर करण्याचा प्रयत्न करणे, औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज झाल्यानंतर तसे व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवल्याबद्दल मारहाण करणाऱ्या आणि तोडफोड करणाऱ्या अफजल शेख नावाच्या आरोपीला स्थानिक पोलीस सहकार्य करत असल्यासंदर्भात ही लक्षवेधी सूचना होती.
यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, आम्ही कोकणामध्ये आता आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याच्या पेट्या बांधतो. पण एखादा आंबा जरी त्यात सडका निघाला तर संपूर्ण पेटी खराब होते, तसा हा प्रकार आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण झाल्यानंतर बहुसंख्य समाजाच्या एका व्यक्तीने व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले तर याबद्दल शेखने त्याच्या घरी घुसून त्याला अमानुष मारहाण केली. त्याच्या बहिणीचा विनयभंग केला. देवी-देवतांचे फोटो फोडले. परंतु तेथील पोलीस तसे काही घडलेच नाही अशी भूमिका घेत आहेत. या अफजलच्या घरी टीव्हीवर सतत पाकिस्तानी चॅनेल लावले जातात. त्याच्या गाडीचा नंबर आहे २६११सारखा २६१२. तो सातत्याने दहशतीचा संदेश या परिसरात देण्याचा प्रयत्न करतो.या प्रकरणात त्याला अंतरिम अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पोलिसांकडून पुरेसा वेळ देण्यात आला. अशा या पोलीस निरीक्षकावर तसेच पोलीस अधीक्षकांवर कारवाई करावी, त्याचप्रमाणे या अफजल शेखवर एमपीडीएखाली कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.