Friday, March 28, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यआपल्याला माणसे का ओळखू येत नाहीत?

आपल्याला माणसे का ओळखू येत नाहीत?

  • फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे

माणूस ओळखण्यात चुकलो, मला अजिबात माणसे ओळखू येत नाहीत, मला वाटलंच नव्हतं तो किंवा ती अशी बदलेल, मला कळलंच नाही असं कसं झालं, हे माझ्यासोबतच का होतं? लोकं माझाच गैरफायदा घेतात का?, मलाच लोकं फसवतात. माझाच विश्वासघात का होतो? मला वापरून घेतात. नंतर विसरून जातात. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा अनेकांकडून यासारखे वक्तव्य ऐकत असतो. याही पलीकडे जावून पाहिलं तर प्रत्येकाला असंच वाटतं असतं की मी खूप सरळमार्गी आहे, मी कधी कोणाला फसवलं नाही, कोणाला दुखावलं नाही, सगळ्यांना समजावून घेतलं, होईल तेवढी मदत करत आलो, मग मलाच अशी वागणूक का?

आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांनाच समाजातून, कुटुंबातून, नातेवाइकांकडून, मित्र-मैत्रिणी इतर मंडळींकडून असे अनुभव येत असतात की मी यांना ओळखू शकलो नाही, हे बदलले, हे आधी असे वागत नव्हते. आता असे का वागत आहेत? आपल्याला वाटतं कोणी स्वतःचा स्वार्थ साधून घेतला, कोणाला वाटतं. आपल्याला लोकच धर्जिणी नाहीत, कोणाला वाटतं आपल्या भोळ्या सरळ स्वभावाचा फायदा लोकांनी करून घेतला.

काल आपल्याशी एकदम नीट वागलेला माणूस आज नीट वागेल याची शाश्वती नाही. दोन दिवसांपूर्वी दिलेला शब्द तो आज खरा करेल याबाबत भरोसा नाही, काल त्याचा मूड जसा होता तसा कायम असेल हा पण भरवसा नाही. आपण मात्र विचार करत बसतो याला काय झालं, माझं काही चुकलं का, मी कुठे कमी पडलो? तसं काहीही असो अथवा नसो तरीही पूर्ण जग आणि त्यानुसार जीवन पण बदलत आहे आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूची माणसं पण बदलत आहेत. हेच सत्य आपण स्वीकारत नाही म्हणून आपल्याला मानसिक यातना होतात, आपण आपल्यापेक्षा जास्त इतरांचा विचार करत राहतो, इतरांच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादावर आपली मानसिकता अवलंबून ठेवतो म्हणून आपण दुःखी होतो. जग जितक्या जलद गतीने बदलते तितकेच ताबडतोब लोकं बदलतात कारण त्यांना या बदलत्या जीवनाशी जुळवून घ्यायचं असतं. खूप कमी माणसं अशी असतात जी इतरांशी नसतील पण स्वतःची प्रामाणिक असतात. त्यांच्या आयुष्यात काही तत्त्व, मूल्य त्यांनी जोपासलेली असतात आणि ती अमलात आणणे ते स्वतःचं कर्तव्य समजतात. समाजात बहुतांश लोकं असेच असतात ज्यांच्यासाठी आपण फक्त एक पर्याय असतो. जमलं तर ठीक, नाही जमलं तरी ठीक. संबंध राहिले काय, तुटले काय, आपल्यामुळे एखादी व्यक्ती दुखावली गेली की नाराज झाली याच्याशी त्यांना काहीही घेणे-देणे नसते. त्यांना भूतकाळात राहायचं नसतं. जेवढा जितका संबंध आला, काम झालं, तेवढ्यापुरत्या भेटी-गाठी झाल्या की लगेच पुढील मार्ग धरायचा. झाली घटना, झाली गोष्ट तिथेच विसरायची, ती व्यक्ती पण विसरायची आणि पुढे जात राहायचं हा जीवनाचा नियम झाला आहे.

आपल्या स्वतःच्या वैयक्तिक मतांना, आपल्या जगण्याच्या आणि विचाराच्या पद्धतीला जो मॅच असेल तो टिकेल, आपल्याला जितकं आणि जे देणं शक्य आहे तितकं घेऊन जो गप्प बसेल तो राहील, जो नसेल तो आपोआप दूर होईल. त्यासाठी, त्याला टिकवण्यासाठी, ती ओळख ते नातं समृद्ध करण्यासाठी कोणतेही कष्ट, त्रास घेणे अशा लोकांना गरजेचे वाटतं नाही. जीवनाचे अतिशय सरळ सोपं साधं गणित मांडून लोकं जगत असतात. कोणासाठी थांबणं, कोणाला सांभाळणं, जपणं, वाट पाहणं, स्वतःला बदलण, थोडं झुकणं, थोडं वाकणं, कोणाचा विचार करणं, कोणासाठी वेळ देणं याची लोकांना गरज वाटतं नाही. कोणाला वेळ दिलाच तर तो फक्त कामापुरता, अगदीच वेळात वेळ काढून उपकार केल्यासारखं तो देखील ठरावीक तेवढ्या विषयापुरताच! ही सवय अनेकांना लागलेली आहे. आपण कामात खूप व्यस्त आहोत, आपल्याला बोलायला, भेटायला देखील वेळ नाही, कोणाची सुख-दुःख ख्याली खुशाली विचारायची गरज नाही अशी वृत्ती अनेक लोकांमध्ये पाहायला मिळते. आपण किती बीझी असतो, आपल्यालाच कसे व्याप आणि जबाबदाऱ्या आहेत, रिकामा मोकळा वेळच मिळत नाही हे दाखवणे, तसं भासवणे आजकाल लोकं काळाची गरज मानतात. प्रत्यक्ष भेटणे तर सोडाच पण कोणाच्याही फोनला, मेसेजला वेळेत रिप्लाय देणे, त्याची दखल घेणे हा शिष्टाचार पण अनेकांना जमत नाही. आपण कधीच फ्री नसतो, आपल्याला खूप कामं असतात हे सांगण्यात तसं दाखवण्यात लोकांना खूप मोठ कर्तृत्व वाटतं पण ते त्यांचं वैचारिक दारिद्र्य असतं.

आपलं जे चाललंय ते बरं आहे, आपल्यापुरतं बघा, कोणाची काळजी करायची गरज नाही, कोणाची काळजी घेण्याची गरज नाही. कोण आपल्यासाठी रडतोय, कोण आपल्यासाठी झुरतोय, या सगळ्या गोष्टी फाट्यावर मारण्यात लोकं आता पारंगत झालेले आहेत. कोणाच्याही फंदात पडायचं नाही. काहीही अंगाला लावून घ्यायचं नाही अशी मानसिकता आजमितीला समाजात बोकाळताना दिसते आहे. मुळात लोकांना कोणाच्याही अपेक्षाचं ओझं वाहायचं नसतं, अपेक्षा पूर्ण करणं तर दूर पण त्या समजावून घेण्याची पण तयारी आजमितीला राहिली नाही हे बदलत्या जीवन प्रणालीच दुर्दैव आहे. कोणामध्ये अडकायचं नसतं, कोणासाठी बदलायचं नसतं आणि कोणासाठी काही करायचं पण नसतं म्हणून लोकं बोलताना काहीही बोलले तरी त्या बोलण्यात काहीही अर्थ आणि अधिष्ठान नसते. सगळं काही तात्पुरतं, तेवढ्यापुरतं, वेळ मारून नेण्यासाठी, स्वतःची त्या वेळेपुरती छाप पाडण्यासाठी, समोरचाचा विश्वास संपादन करण्यासाठी अतिशय उथळ आणि वरवरचं असतं. आपल्या वाक्याला, वागणुकीला, आपल्या शब्दाला काहीतरी महत्त्व आहे, किंमत आहे हेच त्यांना माहिती नसतं तर इतरांच्या शब्दाला ते काय महत्त्व देतील? ज्यांचे स्वतःचेच विचार उथळ असतील ते इतरांच्या विचारांची खोली कशी जाणून घेऊ शकतील? जे स्वतःशीच प्रामाणिक नाहीत ते इतरांशी कसे प्रामाणिक राहतील हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे.

आजकाल लोकांना पळवाट हवी असते, अलिप्त राहणं हवं असतं, स्वतःला सेफ ठेवणं, स्वतःला कसलीही झळ लागू न देणं हा प्रयत्न अनेकांचा असतो. सहजासहजी जे मिळेल जे होईल ते स्वीकारायचं आणि तितक्याच सहज ते सोडून पण द्यायचं, विसरून जायचं, साठवायचं नाही असा स्वभाव अनेकांनी अंगीकारला आहे. फक्त वरवरच्या भावना, तात्पुरत्या कल्पना, तेवढ्यापुरते संबंध, लहरीपणा, चंचलपणा आज जगण्याचा प्रकार झाला आहे. लोकांना जवळ यायला वेळ लागत नाही, लांब जायला वेळ लागत नाही. नाती बनायच्या आधीच तुटून जातात तरी कोणाला काही फरक पडत नाही. आपण कोणाचं काही देणं लागतो ही संकल्पनाच आज कालबाह्य झाली आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -