मुंबई (प्रतिनिधी) : ठाणे येथील कोपरी पुलाजवळ ठाणे महापलिकेतर्फे नवीन पुलाचे काम सुरू असताना महापालिकेच्या २,३४५ मिलीमीटर व्यासाच्या ‘मुंबई २’ जलवाहिनीस हानी पोहोचून पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या गळती दुरुस्तीचे काम महापालिकेतर्फे गुरुवार ९ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून शनिवार, दिनांक ११ मार्चला सकाळी १० पर्यंतच्या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामामुळे ९ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून ११ मार्च रोजी सकाळी १० पर्यंत पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील काही परिसरात १० टक्के पाणी कपात केले जाणार आहे.
पूर्व उपनगरामध्ये टी विभागात मुलूंड (पूर्व) व (पश्चिम) विभाग, एस विभागात भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी येथील पूर्व विभाग, एन विभागातील विक्रोळी (पूर्व), घाटकोपर येथील (पूर्व) व (पश्चिम) विभाग, एल विभागातील कुर्ला (पूर्व) विभाग, एम/पूर्व संपूर्ण विभाग, एम/पश्चिम संपूर्ण विभाग येथे, तर शहर विभागातील ए विभागात बीपीटी व नौदल परिसर, संपूर्ण बी विभाग, संपूर्ण ई विभाग, संपूर्ण एफ/दक्षिण विभाग, संपूर्ण एफ/उत्तर विभाग येथे पाणी कपात केले जाणार आहे.