
मुरबाड : मुरबाड तालुक्यातील मुक्याचे कळभांड गावात मंगळवारी पहाटे दोन वाजता अनोळखी इसमाने लावलेल्या आगीत तीन शेतकऱ्यांचे भाताचे दोन हजार पेंढे जळून खाक झाले. याबाबत मुरबाड तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
गणपत दळवी, मोतीराम जाधव, पांडुरंग दळवी या शेतकऱ्यांनी गुरांच्या चा-यासाठी खळ्यामध्ये भाताचे पेंढे साठवले होते. त्या पेंढ्याना कोणीतरी आग लावली, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. गावच्या सरपंच कविता चौधरी, पोलीस पाटील अरुण चौधरी यांनी याबाबत तहसील कार्यालयात माहिती कळविल्यानंतर तलाठी आर. के. सुरोशे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
दरम्यान, आग लावणाऱ्या व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.