मजगांव-खारदोडकुळे भागात नदीला खांड पडून पाणी शिरल्याने वालपिकासह जमिनीचे नुकसान; खार लँड विभागाचे दुर्लक्ष
- संतोष रांजणकर
मुरूड : मुरुड तालुक्यातील मजगांव-खारदोडकुळे भागात समुद्राच्या उधाणाचे पाणी नदीला खांड पडून शेतात शिरल्याने शेकडो एकर जमिनीसह शेतक-यांच्या तोंडाशी आलेल्या वाल पिकाचे नुकसान झाले आहे.
गेली पाच वर्षांपासून मजगांव-खारदोडकुळे भागातील खाडी परिसरात उधाणाच्या पाण्यामुळे नदीला खांड पडल्याने दरवर्षी शेतात पाणी शिरुन समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे आजतागायत शेतकऱ्यांच्या जमिनी व पिकांचे लाखोंचे नुकसान झाले व होत आहे. असे असतानाही खार लँड विभागाच्या अधिका-यांचे या भागाकडे असलेल्या दुर्लक्षाबाबत शेतक-यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत येथील शेतकरी नथूराम तांबडकर यांनी संबंधित खार लॅंड विभागाशी शेतकरी बांधवांसह संपर्क साधून अर्ज – विनंत्या – निवेदन देण्यात आले आहे. मात्र अद्यापही याठिकाणी होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात खार लँड विभागाचा नाकर्तेपणा कारणीभूत ठरत असल्याची खंत यावेळी तांबडकर यांनी व्यक्त केली.
यंदाही उधाणाचे पाणी शेतात शिरून शेतक-यांना शेतजमीन व वाल पिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
शासनाच्या खार लँड विभागाच्या वरीष्ठ अधिकारी वर्गाने या भागाची प्रत्यक्ष पाहाणी करून याठिकाणी नदीला पडलेली खांड बुजविण्यात योग्य उपाययोजना करण्याची मागणी येथील शेतकरी बांधवांच्या वतीने नथूराम तांबडकर यांनी केली आहे.