Friday, May 16, 2025

महाराष्ट्रराजकीयमहत्वाची बातमी

‘करुन दाखविले’ औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबाद बनले धाराशीव

‘करुन दाखविले’ औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबाद बनले धाराशीव

औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’; राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी


नवी दिल्ली (प्रतिनिधी) : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यापुढे औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे फडणवीस यांनी आभार मानले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने ‘करून दाखविले’, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.


'औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’! राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी! पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’...!! असे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.





औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नावाने मागील काही वर्षांपासून राजकारण सुरू आहे. नव्वदीच्या दशकांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादला संभाजीनगर असे नाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून कायमच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर म्हणून केला जातो. तर, उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा केला जातो. हिंदुत्ववादी संघटनांनीदेखील नामांतराची मागणी केली जात होती.


मुघल साम्राज्याचा बादशाह औरंगाबाद याने छत्रपती संभाजी राजे यांची हत्या केली. त्यामुळे त्याच्या नावाचे शहर नको. अशी मागणी घेऊन औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी करण्यात येत होती. आज याला केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली आहे, त्यामुळे आता यापुढे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबाद धाराशिव म्हणून ओळखले जाणार आहे.



...असा आहे नामांतराचा प्रवास


l १९८८मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभेत संभाजीनगर नामकरण करण्याचा नारा दिला.


l १९९५ जूनमध्ये औरंगाबादचे 'संभाजीनगर' नामांतर करण्याचा ठराव मनपाच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठविला.


l १९९५ राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असल्यामुळे नामकरणाची अधिसूचना काढण्यात आली. १९९६ मध्ये मुश्ताक अहमद यांनी औरंगाबादच्या नामकरणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. २००२ मध्ये मुश्ताक अहमद यांनी न्यायालयात दाखल केलेली याचिका निकाली निघाली.


l २०२० मार्चमध्ये औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणबाबतची न्यायालय याचिका, एनओसीबाबत शासनाने प्रशासनाकडून
माहिती मागविली.


l १६ जुलै २०२२ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावाला पुन्हा एकदा मंजुरी दिली.


l २४ फेब्रुवारी २०२३ : केंद्र सरकारने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव याला मंजुरी दिली.

Comments
Add Comment