मुंबई: राज्यातील तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या कैद्यांना यापुढे बेड आणि उशी मिळणार आहे. आत्तापर्यंत तुरुंगात कैद्यांना झोपण्यासाठी ताडपत्री किंवा चादर मिळत होती. मात्र, अतिरिक्त महासंचालक (तुरुंग) अमिताभ गुप्ता यांनी वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या कैदी परंपरेत बदल केला आहे.
अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली. मात्र, ज्या कैद्यांना ही सुविधा हवी आहे, त्यांना हे स्वखर्चाने आणावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गुप्ता यांनी याबाबत तुरुंग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत काही कैदी हे विविध आजाराने ग्रस्त असल्याची माहिती दिली. या कैद्यांची आजारपणामुळे रात्री नीट झोप होत नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे गुप्ता यांनी सांगितले. त्यासाठीची साईजही निश्चित करण्यात आली असल्याही माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्रात सध्या ५० वर्षे वयापेक्षा अधिक असलेल्या कैद्यांची संख्या जवळपास साडे तीन ते ४ हजार एवढी आहे. या ज्येष्ठ कैद्यांव्यतिरिक्त जर तुरुंगात एखादा कैदी अनेक दिवसांपासून आजारी असेल आणि तुरुंगातील डॉक्टरांनी तसे प्रमाणित केल्यास आणि शिफारस केल्यास संबंधित कैद्यांनाही बेड आणि उशीचा वापर करण्यास परवानगी दिली जाईल.