मुंबई : बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा उद्यापासून सुरू होत आहेत. त्यातच राज्यातील महाविद्यालयीन आणि विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे कर्मचारीच असल्याने कॉलेज बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. आश्वासित प्रगती योजना, ५८ महिन्याची थकबाकी, १४१० कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, या मागण्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचं आंदोलन करण्यात आले आहे.
विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी अनकेदा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. याबाबत अनेकदा बैठका झाल्या. प्रत्येकवेळी मागण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन देखील देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मागण्या मान्य होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर गेल्या तीन वर्षांपासून या प्रलंबीत मागण्यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे. मात्र तरीही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.