शिर्डी : अमरावतीहून शिर्डीला सहलीसाठी आलेल्या ८२ विद्यार्थ्यांसह ६ शिक्षकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील आदर्श हायस्कूलमधील हे विद्यार्थी असून दोन दिवसांपूर्वी ते सहलीसाठी निघाले होते. शिर्डीत येण्यापूर्वी त्यांनी शेवगावजवळ दुपारचे जेवण केले आणि त्यानंतर शिर्डीत आल्यानंतर त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. मात्र रात्री परतीच्या मार्गावर निघाले असताना विद्यार्थी आणि काही शिक्षकांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले.
विद्यार्थांना अधिक त्रास जाणवत असल्याने शिक्षकांनी सर्व मुलांना रात्री शिर्डीच्या साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आता सर्वांची प्रकृती ठिक असली तरी यातील काहींना तापही येऊ लागल्याने खबरदारी म्हणून रुग्णालयाने सर्व विद्यार्थांना देखरेखीखाली ठेवले आहे.
विशेष म्हणजे या मुलांनी बाहेर कुठे काही खाल्ले नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. जेवण तयार करण्याची सामुग्रीही सोबतच असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे सततचा प्रवास आणि पाण्यात बदल झाल्यामुळे उलट्या आणि जुलाब सुरू झाले असावेत, असा अंदाज डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
अमरावतीहून सहलीसाठी एकूण २२७ विद्यार्थी आले असून यातील ८२ विद्यार्थ्यांना त्रास झाला. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून साईनाथ रुग्णालयाचे सर्व डॉक्टर आणि कर्मचारी विद्यार्थ्यांची काळजी घेत आहेत. परिस्थितीनुसार सायंकाळी विद्यार्थी आणि शिक्षकांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.