नवी दिल्ली : निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या राज्यातील सत्तासंघर्षांवर सुरू असलेल्या सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे.
शिवसेनेतील बंडानंतर राज्यात आलेले एकनाथ शिंदे यांचे सरकार कायदेशीर आहे का, यावर सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे.
या सुनावणीचा आज सलग तिसरा दिवस असून दोन्ही बाजूंनी कायद्याचा कीस पाडला जात आहे.
शिंदे गटाकडून आज अॅड. महेश जेठमलानी युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी बहुमत चाचणीचा राज्यपालांचा निर्णय कसा योग्य होता, हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
महेश जेठमलानी हे मध्य प्रदेशातील एका केसचा हवाला देताना म्हणाले की, उपाध्यक्षांना यासंदर्भात निर्णय करायचा आहे, म्हणून राज्यपाल बहुमताची चाचणी थांबवू शकत नाहीत. हेच मध्य प्रदेशच्या २०२०च्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड करत काँग्रेसचे कमलनाथ सरकार कोसळले होते, हा त्यावेळेचा हवाला आहे. याद्वारे त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांचा निर्णय कसा योग्य होता हे सांगण्याचा प्रयत्न केला.
काल खटल्यामध्ये नबाम रेबिया प्रकरणी घटनापीठाने दिलेल्या निकालाच्या फेरविचाराबाबत निर्णय घटनात्मकदृष्टय़ा कठीण असल्याचे तोंडी निरीक्षण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले. उद्धव ठाकरे विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न गेल्यामुळे रेबिया निकालाचा फेरविचार काथ्याकूट ठरतो, असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशासह समस्त राज्याचे लक्ष लागले आहे.