मुंबई : मुंबईत वरळी येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या ४२व्या मजल्यावरून दगड कोसळल्याने दोन पादचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. साबीर अली (३६) आणि इम्रान अली खान (३०) अशी मृतांची नावे आहेत.
येथे यापूर्वीही इमारतीवरून बांधकामाचे दगड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक वाहनांचे नुकसानही झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साबीर अली आणि इम्रान अली खान हे मंगळवारी रात्री या इमारतीखालून जात होते. यावेळी बांधकाम सुरू असलेल्या या इमारतीवरून भला मोठ्ठा दगड खाली पडला. हा दगड ४२व्या मजल्यावरून पडल्याचे समजते. या दगडाखाली साबीर अली आणि इम्रान अली सापडले. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
वरळीमध्ये यापूर्वीही बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून दगड कोसळ्याच्या घटना घडल्या होत्या. त्यात ९ जानेवारी रोजी दगडाखाली सापडून दोघांचा मृत्यू झाला होता. मात्र, असे अपघात होऊनही बांधकाम करताना योग्य ती दक्षता घेतली जात नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे.
मुंबईत योग्य ती खबरदारी न घेता बांधकाम होत असेल आणि त्यात नागरिकांचा जीव जात असेल, तर ही अतिशय भयंकर घटना आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. गगनचुंबी इमारतीचे बांधकाम करताना योग्य ती काळजी घेतली जावी. अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.