नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी उद्या होणार आहे. हे प्रकरण पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठाकडे राहणार की सात न्यायमुर्तींच्या घटनापीठाकडे जाणार हे उद्याच्या सुनावणीत ठरणार आहे.
सत्तासंघर्षाबद्दल सलग २ दिवस सुनावणी झाल्यानंतर आता पुन्हा उद्या, गुरूवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मंगळवारच्या सुनावणीत ठाकरे गटाकडून युक्तिवाद मांडण्यात आला होता. त्यानंतर बुधवारच्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील हरिश साळवे, नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद मांडला. सुप्रीम कोर्टात उद्या शिंदे गटाचे वकील युक्तीवाद करणार आहेत. त्यानंतर सुनावणी होईल. हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवावे की नाही याबाबत कोर्ट निर्णय घेणार आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा या ५ जणांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने अॅड. कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया प्रकरण, पक्षांतर बंदी कायदा याबाबत सात न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर फेरविचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. तर शिंदे गटाची बाजू अॅड. हरीश साळवे मांडत आहेत. सुनावणीसाठी ते लंडन येथून ऑनलाईन हजर झाले आहेत.