- फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे
विवाहबाह्य संबंधातील प्रत्येक लेखाद्वारे आपण त्याचे दुष्परिणाम त्यातून उद्भवणाऱ्या विविध स्वरूपाच्या समस्या यावर चर्चा केली आहे. समुपदेशनाला आलेल्या विविध प्रकरणांतून अनेक नवनवीन घटना, समस्या, व्यथा समोर येतात आणि असे त्रास, असे दुःख शक्यतो कोणाच्याही वाटेला येऊ नये, यासाठी लेखामार्फत जनजागृती आणि समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जातो.
आईचे विवाहबाह्य संबंध असल्यास मुलांना प्रचंड मानसिक यातनांना सामोरं जावं लागतं, त्यांच्या बालमनावर परिणाम होतो, त्यांना असुरक्षित वाटते यावर आपण चर्चा केली आहे. यातून हे संबंध उघड-उघड राजरोस पणे मुलांसमोर ठेवले जात असतील, तर लहान वयातील मुलाच्या मानसिकतेवर खूप विपरित परिणाम होतात आणि त्याचा त्रास भविष्यात मोठ्या प्रमाणात जाणवतो. कोणत्याही कारणास्तव पती आयुष्यात नसेल, तर महिला परपुरुषाचा आधार शोधते. कोणत्याही स्त्रीला भावनिक, शारीरिक, आर्थिक पाठबळ आवश्यक वाटणे साहजिकच आहे. पण त्यात कितपत वाहत जावे. आपल्यासोबतच आपल्या लहान मुलांना किती तडजोड करायला लावावी, याचे भान अनेक महिलांना राहत नाही. एखादा पुरुष आपल्या परिस्थितीचा गैरफायदा घेतोय हे तर त्यांना समजत नाहीच. पण आपल्या मुलांचीही तो थोडीही काळजी करत नाही, फक्त वरवरच खोटं प्रेम आणि सहानुभूती दाखवतोय हे महिलांना लक्षात येत नाही. आपल्या मुलांची सुरक्षा, करिअर, आरोग्य, त्यांना आईची असलेली गरज, वेळ, अभ्यास, दररोजचे रुटीन या सगळ्या गोष्टी कोणताही परका पुरुष जाणून त्याप्रमाणे वागू शकत नाही वा त्याला तशी गरजही भासत नाही. हाच पुरुष स्वतःच्या मुलांचे संगोपन, स्वतःच्या कुटुंबाची घडी मात्र व्यवस्थित सांभाळत असतो. आपल्या मुलांना वाऱ्यावर सोडत असलेल्या पुरुषाशी अनैतिक संबंध आपण किती वर्षे ठेवणार आहोत, त्यातून आपल्या पदरात काय पडणार आहे याचा कोणताही दूरचा विचार महिला करत नाही. आपल्या प्रेमासाठी स्वतःच्या लहान मुलांच्या आयुष्याशी खेळणारी महिला, स्त्री म्हणून पत्नी म्हणून, माता म्हणून कोणत्याही पुरुषाला मनापासून आवडत नसते. त्याचा तिच्यापासून होणारा तत्कालिक फायदा होत राहतो, दोघांना तात्पुरती मजा मिळत राहाते. मात्र तिच्या मुलांचं संपूर्ण बालपण ती होरपळून काढत आहे, अशी आज समाजात परिस्थिती पाहायला मिळते.
अंजली (काल्पनिक नाव) पतीच्या निधनानंतर दोन छोट्या मुलींना घेऊन आयुष्य जगत असताना तिला अभय (काल्पनिक नाव) भेटतो. प्रेम, आकर्षण, एकमेकांचे शब्द झेलणे दोन्ही बाजूने सुरू असते. एकमेकांना लाड, प्रेम हट्ट पुरवताना आपण एक परकी स्त्री म्हणून अभयच्या आयुष्यात कोण आहोत? हे अंजली विसरून जाते. प्रेमाचे, त्यागाचे, तथाकथित डायलॉग मारून अभय अंजलीला स्वतःमध्ये गुंतून ठेवायला सुरुवात करतो आणि हे अनैतिक विवाहबाह्य संबंध अंजलीसाठी तीचं आयुष्य बनून जातात. अभयला स्वतःच्या मुलाबाबतीत कोणतीही तडजोड मान्य नसते. त्याचं शिक्षण, त्याच्या गरजा यावर अभय आणि त्याची पत्नी खूप मेहनत घेत असतात. अभयचा मुलगा एकवीस वर्षाचा असूनही त्याला कधी काहीच कमी पडणार नाही, तो भावनिक मानसिक दृष्टीने कायम सुरक्षित राहील, यासाठी वेळोवेळी अभय त्याला वेळ देणं, स्वतः कुठे बाहेर असल्यास सतत फोनवर त्याच्याशी संपर्कात राहणं याबाबत अभय दक्ष असतो. अभयचा मुलगाही चांगले गुण मिळवणं, अभ्यासासोबत इतर अनेक गोष्टी शिकणं, त्यात उत्तुंग यश मिळवणे यात अग्रेसर होता. उलटपक्षी अंजलीच्या दोन्ही मुली अभ्यासात साधारण होत्या आणि इतर कोणताही क्लास, छंद, नवीन काहीच शिकणं, यासाठी अंजली त्यांना वेळ देऊ शकत नव्हती. अंजलीच्या मुली मात्र एक १५ वर्षांची, तर दुसरी १२ वर्षांची असून त्यांना अंजली अभयशी असलेल्या रिलेशनशिपमुळे न्याय देऊ शकत नव्हती. अभय अंजलीशी नुकताच बोलण्याच्या ओघात बोलून गेला होता की, दोन्ही मुली दहावी किंवा बारावी झाल्यावर ताबडतोब त्यांची लग्न करून टाक, त्यांना काही स्वतःजवळ जास्त दिवस ठेऊन उगाच सांभाळत बसू नकोस. मी मदत करेलच तुला. तुझ्यावरील जबाबदारी जाईल आणि तू पूर्ण वेळ माझ्यासाठी देऊ शकशील. हे ऐकून अभय आपल्या मुलींबाबत किती कोता विचार करतोय, हे अंजली समजून चुकली होती.
समुपदेशनदरम्यान अंजली सांगते की, अभय माझ्या आयुष्यात मागील ६ वर्षांपासून आहे. पण मला त्याचं मन सांभाळण्यासाठी, त्याच्यासोबत राहण्यासाठी कायम माझ्या मुलींना घरी एकटं ठेवावं लागतं. कायम मलाच तडजोड करावी लागते. अनेकदा अभय मला रात्री भेटायला बाहेर फिरायला नेतो, मुक्कामी राहायला लावतो. अभयची पत्नी आणि मुलगा बाहेरगावी गेले असल्यास त्याच्या घरी मला राहायला भाग पडतो. अभयला भेटण्यासाठी एक-दोन तास मुलींना घरी एकटं ठेवायला मला काहीच वाटतं नाही. त्या राहतात, घरं सांभाळतात. पण मी सतत दिवसरात्र त्यांच्यापासून दूर राहाते याबाबत अभयला काहीच जाणीव होत नाही. त्याच्या पोटच्या मुलाशी तो असं वागेल का? अंजली सांगत होती आजकाल तिला ही गोष्ट खूप त्रासदायक ठरते आहे की, तिच्या वयात येणाऱ्या मुलींना ती वेळ देऊ शकतं नाही, सतत अभयच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, त्याला नाराज करायचं नाही म्हणून, तिला स्वतःच्या मुलींकडे दुर्लक्ष करावं लागत आहे. त्यातून मुलींच्या लग्नाचा विषय अभयने घेतल्यापासून अंजली दुखावली गेली होती. आपल्या मुली आपण कटवायच्या का? त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यांना सर्वगुणसंपन्न होऊन योग्य वय झाल्यावर अनुरूप जोडीदार शोधणं हे अंजलीचं स्वप्न होतं.
अंजलीला आर्थिक बाबतीत सहाय्य करणे, तिच्या मुलींसाठी पैसा पुरवणे, अंजलीची हौस-मौज करणे जरी अंजलीसाठी योग्य होतं, गरजेचं होतं तरी दुसऱ्या बाजूला तिच्या मुलींना ती दुरावत होती हे तिच्या लक्षात येत होतं. अभय अंजलीला त्याच्या बिजनेस टूर्ससोबत आठ-दहा दिवस सुद्धा बाहेरगावी घेऊन जात होता, त्या त्या वेळी अंजली मुलींना घरी एकटं टाकून जात होती. हेच जर अभयच्या मुलाला मात्र एक दिवस अथवा एक रात्र जरी काही अडचणीमुळे घरी एकटं राहायची वेळ येणार असेल, तर अभय आकाश-पाताळ एक करत होता आणि त्याची व्यवस्थित सोय होईल अथवा त्याच्याजवळ कोणी न कोणी असेल याची खबरदारी घेत होता. हेच अंजलीच्या मुलींच्या बाबतीत मात्र तो पूर्ण पणे निष्क्रिय होता हे अंजलीला खूप खटकत होतं. आपण कुठे चुकतोय, यातून बाहेर कसं पडावं, अभयला पण सोडायला मन तयार होत नाही, मुलींमध्ये पण जीव अडकतो अशा द्विधा मन:स्थितीमध्ये अंजली सापडली होती आणि समुपदेशनमार्फत तिला मार्गदर्शन हवं होतं.