टाटा समूहाचे अध्वर्यू जेआरडी टाटा यांनी देशात पहिली प्रवासी विमान कंपनी स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सन १९३२ मध्ये पूर्णही केले. त्यावेळी जुहू विमानतळावरून त्यांनी जुहू-कराची-जुहू असे विमानोड्डाणही केले. ते पट्टीचे वैमानिक होते. (या उड्डाणाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी पुन्हा १९८२ मध्ये असेच उड्डाण स्वतः केले.) त्यांनी नंतर टाटा विमान कंपनी स्थापन केली आणि भारतात अजून स्वातंत्र्याची पहाटही उगवली नव्हती तरीही त्यांची कंपनी भरभराटीला आली. नव्या काळाची चाहूल अगोदर टाटांनाच लागली आणि त्यांच्या या कंपनीने जबरदस्त झेप घेतली. देशात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसचे सरकार आले आणि नेहरूंवर समाजवादी विचारांचा पगडा होताच. त्यामुळे रफी अहमद किडवाई नावाच्या मंत्र्याच्या सातत्यपूर्ण दबावामुळे नेहरूंनी चांगली चालत असलेली टाटांची विमान कंपनी सरकारच्या घशात घातली. राष्ट्रीयीकरणाचे भूत सरकारच्या मानगुटीवर होते आणि खासगी कंपन्या चालवणे हे सरकारचे काम नाही, हे समजण्याइतपत तेव्हा सरकारमध्ये परिपक्वपणा आला नव्हता. आपल्याच कंपनीला सरकारच्या घशात विनासायास घातले गेल्याचे जेआरडींनी पाहिले. त्यांनाच या कंपनीचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची गळ सरकारने घातली आणि जेआरडींनी ती मानली.
हा सारा इतिहास आज आठवण्याचे कारण म्हणजे टाटांकडे पुन्हा एअर इंडिया आली, तेव्हा ती पुरेशी कर्जबाजारी होऊनच. दररोज ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज सरकारने करून त्यांच्या ताब्यात पुन्हा कंपनी दिली. टाटांच्या एअर इंडियाची ही दुर्दशा कुणी केली आणि का?, ती वेगळी कहाणी आहे. एअर इंडियाने ५०० लहान आणि बोईंगसारखी विराट विमाने खरेदी करण्याची तयारी केली आहे. सध्या हवाई वाहतूक क्षेत्रात कमालीची मंदी आहे आणि त्याची कारणे जागतिक मंदीचे संकेत, मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान कंपन्यांत होत असलेली नोकरकपात म्हणजेच ले ऑफ, अनेक व्यवसायांचे बंद पडणे आणि कोरोना महामारीच्या काळात झेलावी लागलेली संकटे ही आहेत. हवाई वाहतूक क्षेत्र हे पर्यटन क्षेत्राप्रमाणेच घायकुतीला आले आहे. २०२२ मध्ये हवाई वाहतूक क्षेत्रात एअर इंडियाचा बाजारपेठेतील वाटा केवळ ८.७ टक्के असून हा आतापर्यंतचा त्यांचा सर्वात निचांकी वाटा आहे. एअर इंडियाचा म्हणजेच टाटांचा देशांतर्गत बाजारपेठेतील वाटा वाढवण्याचे उद्दिष्ट एक तृतियांश इतके आहे. पण ते साध्य होऊ शकलेले नाही. त्यांचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी आहे इंडिगो. ज्यांच्याकडे लहान चणीची विमाने, ज्यांना ‘नॅरोबॉडी विमाने’ असे म्हणतात, ती मोठ्या संख्येने आहेत. देशांतर्गत उड्डाणांसाठी ही विमाने अत्यंत उपयुक्त आहेत आणि म्हणूनच टाटांच्या एअर इंडियाने या प्रकारची चारशे आणि बोईंग विमाने आपल्या ताफ्यात खरेदी करण्याची योजना आखली आहे. बाॅम्बे हाऊस या एअर इंडियाच्या मुख्यालयात या करारावर स्वाक्षरी झाली असून पुढील आठवड्यात हा करार अमलात आणला जाईल. पुढील चार वर्षांत हा विमानांचा ताफा एअर इंडियाकडे दाखल होईल. हा महाकरार अर्थातच १५० अब्ज रुपयांपेक्षाही जास्त रकमेचा आहे आणि इतक्या मोठ्या खरेदी करारावर सवलतीही तशाच दणक्यात मिळत असतात. या करारामुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवासी बाजारपेठेत प्रचंड बदल होतील. टाटांना टक्कर देण्यासाठी इतरही कंपन्या आपली सेवा दर्जेदार करतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार जे पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे, त्याला या करारामुळे योगदान मिळणार आहे.
एअर इंडियाची बरीचशी विमाने जुनाट आणि मोडकळीस आलेली आहेत. अजूनही ती सेवेत आहेतच, त्यामुळे टाटांच्या ब्रँडची बदनामी होत होती आणि कोणत्याही व्यवसायात ब्रँडला किती महत्त्व असते, ते वेगळे सांगायला नकोच. एअर इंडियात एअर एशिया आणि विस्तारा सामिल करण्यात आले असून तिन्हींचा मिळून बाजारपेठेतील वाटा वाढण्याची शक्यता आहे. बाजारपेठेतील वाटा वाढणे याचा अर्थ बाजारात नेतृत्व करणे, असा असल्याने टाटा यास किती महत्त्व देत असतील, ते सहज कळून येईल. २०२७ पर्यंत बाजारपेठेतील वाटा ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा टाटांचा उद्देश असून त्या दृष्टीने हा महाकरार निश्चितच एक उत्प्रेरकाचे काम बजावणार आहे. मोठ्या विमानांना वाइड बॉडीज असे म्हटले जाते आणि त्यांचा उपयोग युरोपीय देशांतील उड्डाणांसाठी करण्यात येईल. सध्या कोविड महामारीनंतरचा काळ आणि जागतिक मंदी यामुळे खुद्द एअर बस विमाने पुरवठा करणारी बाजारपेठही अत्यंत टाइट आहे. याचा अर्थ असा की, टाटांना मागणी नोंदवलेली विमाने भारताच्या ताफ्यात दाखल करण्यासाठी त्वरेने मागणी नोंदवली, तरच वेळेवर मिळतील. टाटांच्या विमानांची अवस्था काय आहे, ती नेहमीच्या प्रवाशांना माहीत आहेच. तुटलेली आसने, ट्रे आणि टेबल्स, आतील करमणुकीचे कार्यक्रम दाखवणारे पडदे नेहमी बंदच असतात. आतील सजावटही उदास करणारी असते. सरकारी मालकीची कंपनी होती, तेव्हा कुणीही या कंपनीत गुंतवणूक करण्यास उत्सुक नव्हते, ते याच आतील गलिच्छ अवस्थेमुळे. त्यामुळे टाटा सन्सचे प्रमुख चंद्रशेखरन यांनी जेव्हा हा करार केला, तेव्हा वरील चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर असणार. टाटांच्या नव्या विमानांमुळे निश्चितच प्रवाशांचा ओढा पुन्हा आपल्या लाडक्या विमान कंपनीकडे वाढेल. मात्र हा करार अमलात आणण्यात काही जे बारीक अडथळे आहेत, म्हणजे डिलिव्हरी मिळण्यास उशीर वगैरे ते दूर झाले पाहिजेत, तरच टाटांची योजना यशस्वी होईल.
-उमेश कुलकर्णी