भाईंदर : मीरा भाईंदरमधील नवघर नाका येथे भाईंदर ते श्रीवर्धन एसटी बस सुरू करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यावेळी सुमारे ४०० हुन अधिक जणांनी स्वाक्षरी करून श्रीवर्धन एसटी बस सुरू करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. याकरता एसटी महामंडळाकडे पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे.
तरुण वर्ग व कोकणातील चाकरमानी, स्थानिक मनसे सचिव अनिल रानावडे, राजन पवार, अनिल कोटकर, रवी पाष्टे, अभिषेक नांदगावकर, संजय जगताप, उमेश भिऊगडे, विजय काते, निरंजन नवले तसेच समर्थ प्रतिष्ठानच्या महिला व पुरुष पदाधिकारी व मनसे पदाधिकारी यांचा स्वाक्षरी मोहिमेत समावेश होता.
मीरा भाईंदर शहरात कोकणामधील चाकरमानी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. यामध्ये भाईंदर ते रायगड मार्गे श्रीवर्धन असा प्रवास करणारे प्रवाशी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. कोरोनापूर्वी भाईंदर ते श्रीवर्धन एसटी बस भाईंदर (पूर्व) येथून दररोज सकाळी ६.०० वाजता सुरु होती. मात्र गेल्या २ वर्षांपासून शासनाकडून ही एसटी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करण्याकरता खासगी वाहन अथवा बोरिवलीला जावे लागते. यामध्ये खासगी वाहनचालक प्रवाशांकडून अवाच्या सव्वा रक्कम घेतात. यामुळे स्थानिकांना नाहक त्रास होत आहे. याकरता भाईंदर ते श्रीवर्धन एसटी बस सेवा पुर्ववत करण्याच्या मागणी करता स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.