ठाणे : प्रत्येकाला स्वतःचं, चांगल्या दर्जाचं आणि चांगल्या परिसरात हक्काचं घर हवं असतं. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशीही घर बनवावीत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येत्या दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार आहोत. त्याचप्रमाणे ठाण्यातील रस्तेही खड्डेमुक्त करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
एमसीएचआय- क्रेडाई, ठाणे, ठाणे इस्टेट एजंट असोसिएशन यांच्यावतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर आयोजित गृहबांधणी प्रकल्पांच्या ( प्रॉपर्टी) प्रदर्शनास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रताप सरनाईक, क्रेडाई एमसीएचआय ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, दीपक गरोडिया, राजू व्होरा, बांधकाम व्यावसायिक व राज्य शासनाच्या मैत्री समितीचे उपाध्यक्ष अजय अशर, रेमंड चे संदीप माहेश्वरी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते यावेळी प्रदर्शनानिमित्त आयोजित डेस्टिनेशन ठाणे परिसंवादाचे उद्घाटन झाले.
ठाणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बायपास रस्ता तयार करणार आहोत. या कनेटिव्हिटीमुळे शहराचा पर्यायाने राज्याचा विकास होण्यास मदत होत आहे. यासाठी केंद्र शासनाचे सहकार्य आहे. केंद्र व राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्यामुळे राज्यातील प्रलंबित प्रकल्पांसाठी सुमारे २ लाख कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.