Saturday, February 8, 2025

उठाठेव

काल संध्याकाळी एक पुस्तक माझ्या हाती लागलं. स्वामी आनंद ऋषी यांनी लिहिलेलं ‘मला उमजलेले ओशो’ या पुस्तकाला पी. सी. बागमार ऊर्फ स्वामी सत्य निरंजन यांची प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेतील हा एक किस्सा… हा किस्सा मला एवढा आवडला की, तो स्वामी सत्य निरंजन यांच्याच शब्दांत जसाच्या तसा सांगतो.

‘१९६६ सालच्या ऑक्टोबरमधली ही घटना. त्यावेळी ओशोंचा मुक्काम बाफना दांपत्याच्या घरी होता. एके संध्याकाळी मी बाफना दांपत्याच्या घरी गेलो होतो. माझ्या नशिबाने ओशो एकटेच तिथल्या दिवाणखान्यात चकरा मारीत होते. ओशो असे एकटे सापडणे महाकठीण काम होते. मी लगेच त्यांच्या समोर उभा राहिलो आणि पटकन विचारले, ‘आचार्यजी, आपके पास जो अप्रतिम बुद्धी है, वह आपने कमाई है? या कोई परमात्मा की आपको भेट है?’

हे ऐकताच ओशो चटकन थांबले, तीक्ष्ण नजरेने त्यांनी माझ्याकडे पाहिले व ते म्हणाले, ‘गलत प्रश्न पूछने की आदत छोड़ दो। जब भी प्रश्न पूछना हो, तो प्रश्न का तीर अपने तरफ रखो। ताकी अगर प्रश्न का उत्तर ठीक से आया तो तीर तुम्हें चुभेगा, फायदा तुम्हारा होगा, जैसे यह प्रश्न तुमने मुझे पूछा की, ‘यह मिली बुद्धी मैने कमाई है की, कोई परमात्मा की मुझे भेंट है? मैं कह दूँ की – हां मैने कमाई है, या मुझे भेंट मिली है, तो तुम्हे क्या फर्क पड़ेगा?’
हे सगळं बोलणं चालू असताना माझ्या नजरेला त्यांची नजर तशीच भिडलेली होती. ते पुढे म्हणाले, ‘लेकीन तुम्हारे भीतर झांक कर, मैंने जान लिया है, की तुम पूछना चाहते हो की, अगर ऐसी बुद्धी मुझे चाहिये, हो तो मुझे क्या करना चाहिए?’ एवढं बोलून ते दोन पावलं पुढे आले. माझ्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला आणि हसून विचारलं, ‘क्यों ऐसा ही पूछना था ना?’
त्यांच्या या हसण्याने माझ्यातील सर्व ताण शमला, जणू हृदयात मधुर चांदणे पसरले आणि हसून मी म्हटलं, ‘हां हां। ऐसाही कुछ है।
बागमारजींचा हा प्रश्न योग्य होता, पण विचारण्याची पद्धत आणि शब्द चुकीचे होते, पण आपल्या बाबतीत तर प्रश्नच चुकीचा असतो. ओशो म्हणाले तसं, ‘गलत प्रश्न.’
आपल्याला एखाद्या घटनेशी काहीही देणं नसतं तरीही आपण उगाचच एखाद्याला प्रश्न विचारतो, नसत्या चौकशा करतो.
‘तो अमुक तमुक क्रिकेटिअर एका जाहिरातीत काम करायचे किती पैसे घेतो?
‘त्या अमक्या नटीचा डिव्होर्स झाला का रे?’
‘त्या तमक्याचं लफडं आहे म्हणतात. खरंय का ?’
हे आणि अशाच प्रकारचे प्रश्न आपल्यालाही कुणीतरी विचारले असतील. कदाचित आपणही इतरांना विचारले असतील…
आपला काहीही संबंध नसताना लोक या चौकशा कशासाठी करतात?
सरकारी, निमसरकारी आणि अगदी खासगी ऑफिसातही हे प्रकार चालतात.
त्या अमक्याला इन्क्रिमेंट किती मिळालं?
त्या तमक्याला प्रमोशन मिळाल्यानंतर त्याचा पगार किती रुपयांनी वाढला?
कुणाची बायको कुठे नोकरी करते? आणि तिला किती पगार मिळतो?
यासारख्या प्रश्नांची उत्तरं मिळून विचारणाऱ्याच्या आर्थिक किंवा सामाजिक स्थितीत काहीही फरक पडणार नसतो. पण तरीही माणसं अशा प्रकारच्या चौकशा करतातच. ज्याला इंग्रजीत ‘गॉसिप’ म्हणतात, त्यातलाच हा प्रकार असतो.
पूर्वीच्या काळी तरुण सासुरवाशिणींना घरी सासूचा नणंदांचा जाच असायच्या. त्यामुळे एखादी सासुरवाशीण नदीवर विहिरीवर पाणी भरायला गेली की तिथं तिच्या समवयस्क, समदुःखी मुलींबरोबर सुखदुःखं वाटताना एकमेकांची चौकशी व्हायची. कधी सासूच्या नणंदांच्या कागाळ्या सांगितल्या जायच्या. त्यातून फार मोठं साध्य होत नसे, पण त्या गांजलेल्या सासूरवाशिणीचं मन थोडं हलकं होत असे. दिवसभराच्या कामाचा शीण थोडा शमायचा. डोक्यावरचा भरलेला हंडा जरा हलका भासायचा. इथपर्यंत ठीक आहे.

पण, अशा प्रकारची उगाच चौकशा करायची सवय लागली की तो स्वभाव बनतो. कुचाळक्या करायचं एक व्यसनच जडतं. मग इकडच्या बातम्या तिकडे आणि तिकडच्या इकडे असली फुकटची पोष्टमनगिरी सुरू होतेहे व्यसन जोपासायचं तर त्यासाठी काहीतरी नवनवीन ताज्या ताज्या बातम्या हव्यात. या नवीन बातम्यांसाठी मग फुकाच्या चौकशा सुरू होतात. ती अमुक तमुक कुठे जाते? कुणाला भेटते? काय करते? तो अमका तमका कुठं नोकरीला आहे? त्याला पगार किती? आणि वरकमाई किती? तो काय खातो नि काय पितो? त्याचे कुणा-कुणाशी कोण-कोणत्या प्रकारचे संबंध आहेत? त्याचे कुणाशीही काहीही संबंध असले तरी आपला त्याच्याशी काहीही संबंध नसताना देखील लोक असल्या उचापती करतात. इंग्रजीत एक म्हण आहे. Birds of same feather fly together संस्कृतमध्ये म्हणतात, ‘समानशीले व्यसनेषु पंडिताची पंडितांशी मैत्री होते, एका चोराची दुसऱ्या चोराशी मैत्री होते तसंच विनाकारण उचापती करणाऱ्या माणसांची तशाच सख्यम्’ प्रकारच्या लोकांशी मैत्री होते. कुचाळक्या करणाऱ्यांचा एक ग्रुप तयार होतो. अशी माणसं मग त्या ग्रुपमध्ये जो उपस्थित नाही, त्याच्याबद्दल कुचाळक्या करतात.

अशा कुचाळक्या करण्यामुळे निव्वळ एक घटकाभरची करमणूक झाली तरी त्याचे दूरगामी तोटे मात्र बरेच होतात.
मुख्य तोटा म्हणजे आपला अनमोल वेळ वाया जातो. विचार गढुळतात, मन कलुषित होतात. नातेसंबंधात गैरसमज निर्माण होतात. मैत्रीला तडा जातो.

अशा प्रकारच्या नसत्या उठाठेवी आणि नको त्या कुचाळक्या करणाऱ्या माणसांची नेमकी मानसिकता काय असते? केवळ दोन घटका करमणूक की? जी गोष्ट मला मिळाली नाही ती दुसऱ्याला कशी मिळाली हा हेवा? का करतात माणसं या नसत्या उठाठेवी?

इंग्रजीत एक शब्द आहे पापाराझी…
इंग्लंड-अमेरिकेसारख्या देशातली ही ‘पापाराझी’ नावाची जमात आहे. हे पापाराझी स्वतःला फार मोठे शोध पत्रकार समजतात. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या, एखाद्या उद्योगपतीच्या मागावर जाऊन त्याचं खासगी जीवन चव्हाट्यावर आणणं हा एकमेव उद्योग करून ही जमात पैसे कमावते. नामवंत नटनट्यांच्या घरी बेडरूमच्या खिडकीला भोक पाडून आत छुपे कॅमेरे घालून फोटो काढण्यापर्यंतही यांची मजल जाते. कोण उद्योगपती कोणत्या पार्टीत दारू पिऊन कुणाबरोबर भांडला याच्या खऱ्या खोट्या बातम्या हे लोक मिळवतात आणि वर्तमानपत्रातून मासिकांतून छापतात. मोठमोठ्या राजकारणी नेत्यांच्या आयुष्यातल्या खासगी गोष्टी ही माणसं जाहीर करतात. कधी कधी तर हे लोक बातम्या मिळवतात आणि त्या ‘जाहीर करू.’ अशी धमकी देऊन ब्लॅकमेलदेखील करतात. मोठ्या माणसांकडून आपली वैयक्तिक आणि खासगी कामं करून घेतात, पैसे उकळतात. अशा सवंग बातम्या मिळवणं हा पापाराझींसाठी हा जगण्याचा व्यवसाय असतो.
पण, उगाचच कुचाळक्या करणाऱ्या इतरांचं काय?
खरं पाहिलं तर आपल्याला कुणाच्याही वैयक्तिक आयुष्याशी काही देणं-घेणं
असतं का?
एखाद्या अभिनेत्रीशी एखाद्या दिग्दर्शकाबरोबर निव्वळ मैत्री आहे की आणखी काही भानगड आहे, याच्याशी आपला काही संबंध असतो का? पण आपल्यालाही अनेकदा त्यात इंटरेस्ट वाटतो. अशा खमंग बातम्या आपण आवडीनं वाचतो. कधी चार मित्रमंडळी जमली तर चर्चादेखील करतो. खरंय ना?
जर आपण हे करत असू तर आपणही काही प्रमाणात पापाराझीच झालेलो असतो. ज्यातून कोणत्याही प्रकारचा लाभ नाही अशा प्रकारची माहिती मिळवण्यात आणि त्यातून चार घटका असुरी आनंद लुटण्याची आपली वृत्तीला नेमकं काय म्हणायचं? आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनात, खासगी आयुष्यात कुणी नाक खुपसलेलं, चौकशा केलेल्या आपल्याला चालतात का? जर या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असं असेल, तर दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यात विनाकारण नाक खुपसण्याचा आपल्याला काही अधिकार आहे का ?
वास्तविक ज्या घटनेशी आपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध नसतो अशा गोष्टींबद्दल आपण बोलूच नये आणि बोलायची वेळ आली तर चांगलंच बोलावं.
सहज आठवली म्हणून एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक माणूस सॉक्रेटिसकडे गेला आणि अगदी दबक्या आवाजात म्हणाला, ‘सर, तुम्हाला ठाऊक आहे का? त्या जमीनदाराच्या मुलाने की नाही…
‘थांब….’ त्याचं बोलणं सॉक्रेटिसने मध्येच तोडलं. ‘तू त्या जमीनदाराच्या मुलाबद्दल जे काही सांगणार आहेस ते सांगण्यापूर्वी आधी माझ्या तीन प्रश्नांची उत्तरं दे. पहिलं म्हणजे तू जे बोलणार आहेस, ते नक्की खरं आहे याची तुला पूर्ण खात्री आहे का? दुसरं म्हणजे तू मला जे सांगणार आहेस, त्यामुळे माझा आणि तुझा काही फायदा होणार आहे का? आणि तिसरं म्हणजे तू त्या जमीनदाराच्या मुलाबद्दल जे सांगणार आहेस ते चांगलंच सांगणार
आहेस का?

या तिन्ही प्रश्नांची उत्तरं जर ‘होय’ असतील तरच तू मला जमीनदाराच्या मुलाबद्दल सांग. पण जर या तीन प्रश्नांपैकी एका प्रश्नाचं जरी उत्तर ‘नाही’ असं असेल तर तू कृपाकरून मला त्याच्याबद्दल काही सांगूच नकोस. तो माणूस गप्पच बसला. सॉक्रेटिस म्हणाला, ‘अरे बोल ना… तुला काही सांगायचं होतं ना? तू त्या जमीनदाराच्या मुलाबद्दल काही सांगणार होतास ना? बोल ना…
सॉक्रेटिसमोर बसलेला तो माणूस मान खाली घालून उभा राहिला आणि काहीही न बोलता आल्यापावली निघून गेला. सॉक्रेटिसने सांगितलेल्या या तीन कसोट्यांवर जर आपण आपलं नेहमीचं बोलणं तपासून पाहिलं, तर आपलं आपल्यालाच आढळेल की गरज नसताना देखील आपण अनेकदा नसत्या उठाठेवी करतो. माझ्या बाबतीत सांगायचं तर मला तरी माझी चूक उमगलीये.
तुमच्या बाबतीत काय?
तुम्हीच विचार करा…!

-गुरुनाथ तेंडुलकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -