Wednesday, April 23, 2025
Homeदेशएसबीआय आणि एलआयसी बाबत काळजीचे कारण नाही

एसबीआय आणि एलआयसी बाबत काळजीचे कारण नाही

अदानी प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतीय बँकिंग प्रणाली चांगल्या स्थितीत आहे. लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. अदानी समूहातील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) या दोन्हींची गुंतवणूक मर्यादेत आहे. तसेच बँक आणि एलआयसी दोन्ही फायद्यात आहेत आणि गुंतवणूकदारांना सध्या काळजी करण्याची गरज नाही, असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले आहे.

हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाला मोठ्या प्रमाणात तोट्याचा सामना करावा लागत आहे. या अहवालामुळे गेल्या आठ दिवसांत अदानी समूहाच्या कंपन्यांचे सुमारे ७० टक्के नुकसान झाले आहे. त्याचबरोबर, कंपनीच्या मार्केट कॅपला ८ लाख ७६ हजार ५२४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचवेळी अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीय बँका आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) यांनाही झटका बसला आहे. गुंतवणूकदारही चिंतेत आहेत. या मुद्द्यावरून संसदेत प्रचंड गदारोळ झाला. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अदानी प्रकरणी आपले मत व्यक्त केले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, माझ्या समजुतीनुसार, अदानी समूहातील एलआयसी आणि एसबीआयची गुंतवणूक ठरविण्यात आलेल्या मर्यादेतच आहे. यावेळी त्यांनी अदानी समूहातील एसबीआय आणि एलआयसीच्या गुंतवणुकीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांनाही स्पष्टपणे उत्तरे दिली.

त्या म्हणाल्या, की मी नमूद करू इच्छिते की एसबीआय आणि एलआयसी या दोघांनी त्यांची तपशीलवार माहिती संबंधित सीएमडी सोबत शेअर केली आहे. त्या अशाही म्हणाल्या की, भारतीय बँका आज एनपीएचे ओझे कमी करण्यात यशस्वी ठरल्या असून त्या मजबूत स्थितीत आहेत.

या मुलाखतीत त्यांनी असेही सांगितले की, एसबीआय आणि एलआयसीने आपण ओव्हरएक्सपोज केलेले नसल्याचे दोघांनी स्पष्ट केले आहे. दोघांच्या वतीने अदानी समूहाच्या शेअर्सचे एक्सपोजर मर्यादेत असल्याची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. त्यांचे मूल्यांकन घसरल्यानंतरही ते फायद्यात आहेत. सीमारामण म्हणाल्या की, सध्या भारतीय बँकिंग व्यवस्थेने एनपीएचे ओझे कमी केले आहे. बँकेकडे मजबूत दुहेरी ताळेबंद आहे. एनपीए आणि रिकव्हरी स्थिती चांगली आहे. त्यामुळे घाबरून जाण्यासारखी कोणतीही परिस्थिती सध्यातरी दिसत नाही, असे त्या म्हणाल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -